कोकणातील जीवनशैली, भाषा, तेथील भुताटकी यावर सुरु असलेली झी मराठीवरील मालिका ‘रात्रीस खेळ चाले’ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मालिकेतील सर्वच पात्रं आपापली भूमिका उत्तम निभावत आहेत. मात्र या मालिकेच्या तीनही सिझनमध्ये प्रेक्षकांना वेड लावले ते ‘शेवंता’ने. मालिकेत शेवंताची भूमिका अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने निभावली आहे. आपल्या अभिनय कौशल्याने अपूर्वाने शेवंताची भूमिका सहज निभावली आहे. मात्र यापुढे अपूर्वा नेमळेकर या मालिकेत दिसणार नाही. काही ज्युनियर सहकलाकारांकडून मिळत असलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे अपूर्वाने ही मालिक सोडण्याचा निर्णय घेतला. आता अभिनेत्री कृतिका तुळसकर शेवंताच्या भूमिकेत दिसत आहे.
‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील शेवंताच्या पात्रासाठी अपूर्वाला 10 किलो वजन वाढवावे लागले होते. मात्र या वाढलेल्या वजनामुळे मालिकेतील ज्युनियर कलाकारांकडून अपूर्वाचे वारंवार विडंबन केले जात होते. उघडपणे खिल्ली उडवत जिव्हारी लागतील अशा कमेंट्स पास केल्या जात होत्या. वरिष्ठांकडे तक्रार केल्यानंतही या कलाकारांकडून दिलगिरी व्यक्त केली जात नव्हती. तसेच प्रोडक्शन हाऊसकडून आठवडय़ातून 5 ते 6 दिवसांचं शूटिंग असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच चॅनेलकडून आणखी एक शो देण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात आठवडय़ात एकच दिवस शूटिंग व्हायचे आणि बाकी पुढचे 3-4 दिवस बसून रहावे लागायचे. चॅनेलकडून दुसरा शो देण्याचे आश्वासनही पाळले गेले नाही. या सर्व कारणांमुळे त्रस्त झाल्याने अपूर्वाने मालिका सोडण्याचा निर्णयघेतला.