मंत्री सुरेशकुमार यांची माहिती : मुलांच्या अध्ययन प्रक्रियेसाठी रुपरेषा आखणार
प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोना संसर्गामुळे शाळा-महाविद्यालये बंद असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होत आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने कोरोना काळातही मुलांचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी तज्ञांची समिती नेमून अहवाल मागविण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे शैक्षणिक उपक्रम हाती घेतले जाणार आहेत, अशी माहिती शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी दिली आहे.
शिक्षण खात्यातील विविध अधिकाऱयांची बैठक घेतल्यानंतर मंत्री एस. सुरेशकुमार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे मुलांचे शैक्षणिक उपक्रम पुन्हा सुरू करण्यासंबंधी माहिती दिली आहे. 2021-22 हे शैक्षणिक वर्षही नियोजित वेळेत सुरू होण्याची लक्षणे दिसून आलेली नाहीत. त्यामुळे मुलांची शिक्षण प्रक्रिया निरंतरपणे सुरू ठेवण्यासाठी आतापासूनच कार्यवाही करण्यासाठी शिक्षण खात्याने पावले उचलली आहेत.
विशेषतः ग्रामीण आणि सरकारी शाळांमधील मुले अध्ययन प्रक्रियेपासून आलिप्त राहू नयेत यासाठी उपाययोजना करून त्यांच्या शिक्षणाच्या हक्काचे रक्षण करणे. तसेच यंदा देखील शिक्षण प्रक्रिया निरंतरपणे सुरू ठेवण्यासाठी पर्यायी उपक्रम हाती घेण्यासंबंधी समिती नेमण्यात येईल. ही समिती रुपरेषा तयार करणार आहे, असे त्यांनी सांगितले आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱया लाटेचा धोका मुलांना होवू नये, या दृष्टीने देखील पर्यायी अध्यापन आणि अध्ययन कार्यक्रम आखणीसाठी तज्ञांच्या समितीने दिलेले सल्ले विचारात घेऊन नव्या शैक्षणिक वर्षासाठी कार्यतत्पर होता येईल, असेही शिक्षणमंत्र्यांनी सांगितले आहे.