सरपंचांच्या हत्येतील मारेकऱयांचा समावेश : दहशतवादी-सुरक्षा दलांमध्ये चकमक
श्रीनगर / वृत्तसंस्था
श्रीनगरमध्ये नौगाम भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये बुधवारी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. यामध्ये 9 मार्च रोजी मारल्या गेलेल्या सरपंचाच्या मारेकऱयांचा समावेश आहे. खात्मा करण्यात आलेले तीन दहशतवादी लष्कर-ए-तोयबा या संघटनेशी संबंधित असून त्यांच्याकडून शक्तिशाली स्फोटके, शस्त्रे आणि गुन्हेगारी साहित्य जप्त करण्यात आले आहे. शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केल्यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घालत व्यापक मोहीम हाती घेतली. या चकमकीमुळे बारामुल्ला-बडगाम-बनिहाल दरम्यान धावणारी रेल्वे बंद करण्यात आली होती. या कारवाईमध्ये दुपारपर्यंत तीन दहशतवाद्यांना टिपण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले. दुपारनंतरही या भागात शोधमोहीम सुरू होती.
काश्मीरमधील नौगाममध्ये बुधवारी पहाटे पोलीस आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाल्याच्या वृत्ताला काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी दुजोरा दिला आहे. सरपंच समीर दार यांच्या हत्येत या दहशतवाद्यांचा प्रत्यक्ष हात होता. दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केल्यानंतरही त्यांना आत्मसमर्पण करण्याची अनेक संधी देण्यात आली होती, परंतु ते शस्त्र सोडण्यास तयार नव्हते. त्यांनी गोळीबार सुरूच ठेवला आणि सुरक्षा दलांच्या प्रत्युत्तरादाखलच्या कारवाईत तीन दहशतवादी ठार झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
श्रीनगरच्या हद्दीतील नौगाम येथील एका घरात दहशतवादी लपून बसले होते. सध्या सुरू असलेल्या चकमकीमुळे रेल्वे व्यवस्थापनाने खबरदारी म्हणून बनिहाल-बारामुल्ला दरम्यान धावणारी रेल्वे सेवा काही काळासाठी स्थगित केली होती. हा रेल्वे ट्रक चकमक ठिकाणाच्या अगदी जवळ असल्यामुळे प्रवाशांना धोका होण्याची संभावना लक्षात घेऊन सावधगिरीच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या.
पाच दिवसात 9 दहशतवाद्यांचा खात्मा
बुधवारी झालेली चकमक गेल्या पाच दिवसांतील पाचवी चकमक होती. या पाच दिवसात एकूण 9 दहशतवाद्यांना यमसदनी पाठवण्यात आले आहे. तर यावषी आतापर्यंत 40 दहशतवादी मारले गेले आहेत. त्यापैकी 21 दहशतवादी जानेवारी महिन्यातच मारले गेले आहेत. मागील वर्षी जानेवारी महिन्यात केवळ 10 दहशतवादी मारले गेले होते.