या आठवडय़ात हैद्राबाद येथे श्रीपाद रामानुजाचार्य यांच्या सहस्राब्दी (1000 वी जयंती) कार्यक्रमानिमित्त चालणाऱया 13 दिवसीय उत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीपाद रामानुजाचार्य यांच्या जगातील दुसऱया क्रमांकाच्या 216 फूट उंचीच्या स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीचे अनावरण होणार आहे. या भारतीय संस्कृतीतील गौरवशाली आणि ऐतिहासिक दिनाबद्दल श्रीपाद रामानुजाचार्य यांना शब्दांजली अर्पण करण्याचा हा छोटासा प्रयत्न.
सृष्टीच्या उत्पत्तीवेळी भगवान श्रीकृष्णाने चार व्यक्तींना भागवत धर्माचे सर्वसमावेशक ज्ञान प्रदान केले. श्री, ब्रह्म, रुद्र आणि सनत्कुमार या त्या चार व्यक्ती आहेत. पद्म पुराणानुसार वर्णन येते, संप्रदाय विहीन ये मंत्रास्ते विफला मता । श्री ब्रह्मरुद्रसनकाः वैष्णवाः क्षिती पावना ।। अर्थात संप्रदायाविहीन मते आणि मंत्र निष्फळ होतात. श्री, ब्रह्म, रुद्र आणि सनत्कुमार हे चार संप्रदाय धरतीला पावन करणारे, जगाचे आत्यंतिक कल्याण करणारे आहेत. या चार व्यक्तींपासून पुढे चार संप्रदाय निर्माण झाले पुढे या प्रत्येक संप्रदायामध्ये निरनिराळय़ा शतकामध्ये एक महान आचार्य अवतीर्ण झाले. श्री संप्रदायामध्ये रामानुजाचार्य, ब्रह्म संप्रदायामध्ये मध्वाचार्य, रुद्र संप्रदायामध्ये विष्णुस्वामी व सनत्कुमार संप्रदायामध्ये निंबार्काचार्य ह्या महान आचार्यांनी भागवत धर्माची पताका भारतावर अनेक परकियांची आक्रमणे होत असतानाही फडकत ठेवली. आजही हे चार संप्रदाय भागवत धर्माचा प्रचार व प्रसार करीत आहेत.
यातील श्री संप्रदायाचे प्रमुख आचार्य श्रीपाद रामानुजाचार्य यांचा जन्म आजच्या तामिळनाडू राज्यातील ‘श्रीपेरुम्बुदूर’ येथे एका धार्मिक कुटुंबात इ.स. 1017 साली झाला. त्यांच्या वडिलांचे नाव केशवाचार्य आणि आईचे नाव कांतिमान होते. वडिलांप्रमाणेच रामानुजही वैदिक शास्त्रात लहानपणापासूनच पारंगत होते. त्याकाळच्या प्रथेप्रमाणे त्यांचे सर्व धार्मिक संस्कारही पार पडले होते. सोळाव्या वषी त्यांचे लग्नही झाले होते. पण त्यांच्या लग्नानंतर एका महिन्यात अचानक त्यांचे वडील केशवाचार्य यांचे दीर्घ आजारानंतर देहावसान झाले. त्यानंतर आपल्या कुटुंबीयांसमवेत त्यांनी कांचीपुरम येथे स्थलांतर केले. तेथे त्यांनी यादव प्रकाश यांच्या गुरुकुलमध्ये वैदिक शिक्षणासाठी प्रवेश घेतला. परंतु वैचारिक आणि सैद्धांतिक मतभेदामुळे यादव प्रकाश आपल्या शिष्यालाच शत्रूरूपात पाहू लागले, परिणामी रामानुज याना घातपात करून मारण्याचा कट यादवप्रकाश यांनी रचला. श्रीवरदराज भगवंताच्या कृपेने याची कल्पना येताच रामानुज यांनी जंगलातून पळून जाऊन कांचीपुरम गाठले. पण नंतरच्या काळात हेच यादवप्रकाश श्री रामानुजाचार्यांचे शिष्य बनले. त्याच्यानंतर रामानुजाचार्यांचा कांचिपूर्णाशी घनि÷ संबंध प्रस्थापित झाला. त्यांची दीक्षा यमुनाचार्यांचे शिष्य महापूर्ण आचार्यांकडून श्री संप्रदायात झाली.
यमुनाचार्यांनी गुप्तपणे रामानुजाचार्यांचे कार्य पहिले होते. ते रामानुजांची कार्यपद्धती आणि व्यक्तिमत्त्वावर फार प्रभावित झाले होते. श्रीयमुनाचार्यांच्या तीन इच्छा होत्या, त्यांना त्या रामानुजांना सांगायच्या होत्या परंतु रामानुज श्रीरंगमला पोहोचण्याआधीच यमुनाचार्यांनी समाधी घेतली. त्यावेळी त्यांच्या पार्थिवाची तीन बोटे दुमडलेली होती. रामानुजांनी जाणले की त्यांच्या तीन इच्छा अपूर्ण आहेत. त्यांनी त्या पूर्ण करण्याची जागेवरच प्रतिज्ञा घेतली. त्यांनी प्रतिज्ञा केली की ‘सामान्य जनांना विष्णुभक्तीचे संस्कार मी देईन’, असे म्हणताच यमुनाचार्यांचे एक बोट खुलले. त्यानंतर ते म्हणाले ‘मी दक्षिणेतील अलवार भक्तांच्या काव्यावर सर्वाना समजेल असे भाष्य करीन’, असे म्हणताच यमुनाचार्यांचे दुसरे बोट खुलले. तिसरी प्रतिज्ञा त्यांनी घेतली व म्हणाले, ‘श्रीवैष्णवांच्या परमसत्याचे मूळ वेदान्तसूत्रावर भाष्य लिहीन’ असे म्हणताच त्यांचे तिसरे बोटही खुलले. रामानुजांनी अशाप्रकारे या तिन्ही प्रतिज्ञा पूर्ण करण्याचे वचन दिल्याबरोबर यमुनाचार्यांची तिन्ही बोटे सरळ झाली. तेथेच यमुनाचार्यांची समाधी बांधली गेली. त्यानंतर त्यांनी महापूर्ण स्वामींकडून व्यासकृत वेदांतसूत्रांचा अर्थ आणि तीन हजार गाथांचा उपदेश प्राप्त केला. एकदा रामानुजांचे गुरु महापूर्ण स्वामींनी त्यांना श्रीरंगम येथे जाऊन गोष्टींपूर्ण स्वामींकडून गुप्त मंत्र स्वीकारण्याची आज्ञा केली. पण गुप्त मंत्र असल्याने गोष्टींपूर्ण यांनी त्यांना मंत्र देण्यास टाळाटाळ केली. रामानुज गुरुमंत्र स्वीकारण्यासाठी प्रामाणिक असल्याने गुरुंकडे मंत्र मिळावा म्हणून त्यांनी 18 वेळा याचना केली. अनेक महिने वाटही पाहिली. शेवटी अश्रुपूर्ण नयनाने गुरुकडे कृपा याचना केली. रामानुजांचा प्रामाणिकपणा आणि उत्कंठा पाहून गोष्टीपूर्ण यांनी त्यांना गुप्तमंत्र कानात दिला आणि सांगितले की हा मंत्र इतका शक्तिमान आहे की जो कोणी प्रामाणिकपणे जप करतो तो विनाविलंब भौतिक दुःखातून मुक्त होतो आणि वैकुंठप्राप्ती करतो जेथे भगवंताच्या प्रत्यक्ष सेवेमध्ये तो रुजू होतो. गुप्त मंत्राचा एवढा प्रभाव असेल तर दुःखामध्ये त्रस्त आहेत त्या सर्वांनाच याचा प्रचार करून दुःखातून मुक्त का करू नये असा विचार करून ते सर्वाना ओरडून बोलावू लागले. ते म्हणाले की ‘मला सर्वांसाठी अमूल्य असे गुपित सांगावयाचे आहे, ज्यामुळे तुमच्या सर्व दुःखापासून मुक्ती मिळेल.’ लोकांचा समुदाय जमा झाल्यावर त्यांनी सर्वाना गुप्त मंत्र जोराने सांगितला. सर्वजण आनंदी होऊन रामानुजांचे आभार मानत त्यांच्या करुणेची प्रशंसा करत घरी निघून गेले. ही घटना रामानुजांच्या गुरुंना समजली. ते रामानुजकडे येऊन क्रोध प्रकट करत म्हणाले ‘मी तुला सांगितले होते की मी दिलेला मंत्र गुप्त आहे, कोणाला कळला नाही पाहिजे. तरीही तू सर्वाना मुक्तपणे, पात्र-अपात्रतेचा विचार न करता मोफत मंत्र वाटून टाकलास. याचा परिणाम तुला माहीत आहे. म्हणून तू अनंत काळपर्यंत नरकात शिक्षा भोगशील?’ रामानुज नम्रपणे म्हणाले ‘हो गुरुमहाराज, मला माहीत आहे, तुमची आज्ञा मोडल्याबद्दल मी नरकयातना भोगण्यास जाईन’. तेव्हा आश्चर्याने गुरुंनी विचारले, ‘तरीही तू मंत्र सर्वाना उघडपणे का दिलास?’ रामानुज उत्तरले ‘आपण सांगितले की जो कोणी हा मंत्र जप करेल तो सर्व दुःखातून मुक्त होऊन वैकुंठाला परत जाईल, मला वाटले इतका सोपा मार्ग दुःखामध्ये तडफडत असलेल्या सर्वानाच द्यावा आणि त्यांना सर्व दुःखातून मुक्त करावे, मग त्यासाठी मला त्या सर्वांचे दुःख नरकात भोगावे लागले तरी चालेल’ रामानुजांच्या या उदार भावनेवर गुरु प्रसन्न झाले आणि त्याला पुढील प्रचारासाठी आशीर्वाद दिले.
-वृंदावनदास