पंतप्रधानांनी मध्यंतरी आवाहन केले होते की संकटाचे संधीत रूपांतर करा. काही लोकांना कशातही संधी शोधायची कला जन्मजात अवगत असते. त्यांना अशा आवाहनाची गरजच नसते. मागे आपल्याकडे स्वाईन फ्लूची साथ आली होती. तेव्हा आपल्याकडच्या घरगुती शास्त्रज्ञांनी शोध लावला की निलगिरी तेलामुळे स्वाईन फ्लू बरा होतो. मग निलगिरी तेलाचे भाव रातोरात कसे वाढले आणि त्यातून नवे रोजगार कसे निर्माण झाले हे वाचकांना आठवत असेलच. निलगिरी तेलामुळे स्वाईन फ्लू बरा झाला की नाही ते ठाऊक नाही, ती गोष्ट सोडा.
इंग्रजीत एक म्हण आहे. एका माणसासाठी विष असलेले दुसऱया माणसासाठी अन्न असू शकते. तद्वत आपल्यासाठी संकट असलेली गोष्ट आपल्या अनेक देशबांधवांसाठी संधी असू शकते. कोरोनाचे आगमन झाल्यावर काही दिवस हायड्रोक्सीक्लोरोक्वीन आणि आर्सेनिक आल्बम ही फिरंगी औषधे बरेच दिवस भाव खाऊन होती. पण हळूहळू आयुर्वेदाच्या नावाखाली काहीही करून आपल्या गळय़ात मारू शकणारे शूरवीर सज्ज झाले. टीव्हीवर बातम्या येऊ लागल्या की अमुक गावातल्या हौशी व्यक्तीने कोरोना हमखास बरा करणारा काढा, चूर्ण, वटी, मात्रा शोधून काढून फिरंग्यांवर मात केली आहे. टीव्हीवर बातमी झळकली की त्या गावात आणि आसपास नवा रोजगार सुरू झाला असेलच. मग काही दिवसांनी दुसऱया गावातल्या हौशी किंवा गवश्याने नवे औषध सोडून काढल्याची बातमी. आपण जसजसे उत्तरेला जावे तसतसे प्रश्नांची सोपी उत्तरे देणारे महापुरुष भेटू लागतात. मध्य प्रदेशात रुग्णांच्या हाताचे चुंबन घेऊन कोरोना बरा करणारा सत्पुरुष अवतरला होता. पण दुष्ट दैवाला हे पाहवले नाही. सदरहू सत्पुरुषालाच कोरोनाची लागण होऊन तो मरण पावला. आणखीन थोडे उत्तर दिशेला एका कोरोनाबाबाने अवतार घेतला होता. तो माफक दरात लोकांना कोरोनापासून रक्षण करणारे ताईत विकत होता. या साऱया लोकांनी आपापल्या पंचक्रोशीत रोजगार निर्माण केले होते यात शंका नाही.
हे सर्व चालू असताना जनमानसाचे लाडके व्हॉट्सअप विद्यापीठ अजिबात मागे नव्हते, नाही. या विद्यापीठातील तज्ञ रोज नवनवी औषधे शोधून काढत असतात आणि त्यांची माहिती आपल्याला विनामूल्य पाठवत असतात. यांच्या औषधांमुळे रोजगार उत्पन्न होत नसला तरी आपली करमणूक होत असते. लॉकडाऊनमध्ये कंटाळलेल्या जिवाला चार घटका विरंगुळा मिळत असतो.