उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रभारी बाजीराव खाडे यांचे गौरवोद्गार
प्रतिनिधी / कोल्हापूर
जागतिक पातळीवर ठप्प झालेली अर्थव्यवस्था असताना कोरोनाच्या संकटामुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले असताना सुद्धा गोकुळची संकलन प्रक्रिया व वितरण व्यवस्था सुयोग्य पद्धतीने चालू ठेवून आपण वेगळा ठसा उमटवला व जिल्ह्यातील लाखो शेतकर्यांना आधार दिला, असे गौरवोद्गार उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रभारी बाजीराव खाडे यांनी काढले. काँग्रेसचे उत्तरप्रदेश प्रभारी व महाराष्ट्र काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या सदस्यपदी निवडीबद्दल बाजीराव नानू खाडे यांचा गोकुळचे चेअरमन रविंद्र आपटे यांचे हस्ते त्यांचा सत्कार करणेत आला. याप्रसंगी खाडे बोलत होते.
यावेळी भात पिक स्पर्धेमध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल मलगोंडा सातगोंडा टेळे, सुळकुड, ता. कागल, तसेच इंटरनॅशनल शुटींग स्पोर्ट्स फेडरेशन आयोजित वर्ल्ड कपसाठी दिल्ली येथे निवड झाल्याबद्दल स्वप्नील सुरेश कुसाळे, कांबळवाडी, ता. राधानगरी यांचा देखील गोकुळच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी चेअरमन रविंद्र आपटे, माजी चेअरमन अरूण नरके, रणजितसिंह पाटील, विश्वास पाटील, अरूण डोंगळे, जेष्ठ संचालक विश्वास जाधव, धैर्यशील देसाई, दीपक पाटील, पी. डी. धुंदरे, उदय पाटील, अमरिशसिंह घाटगे, सत्यजीत पाटील, विलास कांबळे, अनुराधा पाटील, बाबा देसाई, रामराज देसाई कुपेकर, कार्यकारी संचालक डी. ही. घाणेकर व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
गोकुळवर शेतकर्यांची मालकी
– रविंद्र आपटे, चेअरमन गोकुळ
जिल्ह्यातील पाच लाख दूध उत्पादक शेतकर्यांच्या मालकीचा हा संघ आहे. शेतकरी हीत समोर ठेवूनच व्यवस्थापन निर्णय घेते. संचालक मंडळ विश्वस्त म्हणून काम पहात आहे. शेतकर्यांसाठी जे जे काही देता येईल ते देण्याचा प्रयत्न संघाचा असतो.