प्रतिनिधी/ संकेश्वर
संकेश्वर शहरात पुन्हा प्लास्टिकचा वापर मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास येताच, नगरपरिषदेने शहरातील दुकानांवर अचानक धाड टाकून 183 किलो प्लास्टिक जप्त केले. शिवाय 70 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. पहिल्यांदाच इतक्या मोठय़ा रकमेचा दंड धाडीच्या माध्यमातून ठोठावला गेल्याने शहर परिसरातील प्लास्टिक विक्रेते आणि व्यापाऱयांचे धाबे दणाणले आहेत.
प्लास्टिकमुक्त भारत या संदेशाची शहरात चांगलीच जागृती झाली असून नगरपरिषदेने गेल्या दोन महिन्यांपासून प्लास्टिक बंदीसाठी धाडीच्या सत्रात सातत्य ठेवले आहे. त्यामुळे प्लास्टिकमुक्तीच्या चळवळीला खऱया अर्थाने जोर भरला आहे. डिसेंबर महिन्यात तत्कालीन तहसीलदार रेश्मा ताळीकोटी यांनी शहरातील व्यापाऱयांची बैठक घेऊन प्लास्टिकमुक्त शहर झालेच पाहिजे, असा विनंतीपूर्वक इशारा देऊन महिनाभराची डेडलाईन दिली होती. व्यापाऱयांनीही यावेळी प्लास्टिक वापर थांबविण्याविषयी होकार दिला होता. पण डेडलाईनची उलटूनही प्लास्टिकचा वापर सुरूच असल्याचे पहावयास मिळाले. याची दखल घेत नगरपरिषदेने पुन्हा धाडसत्र चालविले आहे.
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जगदीश ईटी, परिसर अभियंता नारायण नाईक व कनिष्ठ आरोग्य निरीक्षक यांनी नगरपरिषद कर्मचाऱयांसह रविवारी प्रजासत्ताक दिनादिवशीच शहरातील दुकानांवर धाडी टाकून 183 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच 70 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. स्वच्छता मोहीम हा राष्ट्रीय कार्यक्रमाचाच एक भाग असून यासाठी कधीही, कोणत्याहीवेळी धाड टाकण्याचा आदेश आहे. तेव्हा व्यापारीवर्गाने दिलेला शब्द पाळावा, असे आवाहन मुख्याधिकारी जगदीश ईटी यांनी केली.