नितीश कुमार यांच्या पक्षात फूट शक्य : श्याम रजक यांचा दावा
वृत्तसंस्था / पाटणा
अरुणाचल प्रदेशातील घटनेनंतर बिहारमधील विरोधी पक्षांची नजर आता भाजप-संजदच्या संबंधावर टिकून राहिली आहे. सत्तारुढ पक्षाचे 17 आमदार संपर्कात असल्याचा दावा राजदचे वरिष्ठ नेते श्याम रजक यांनी केला आहे. यापूर्वी राजदने नितीश कुमार यांना महाआघाडीत सामील होण्याचे निमंत्रण दिले होते.
पक्षांतरबंदी कायद्याच्या अंतर्गत 17 आमदारांना आता राजदमध्ये प्रवेश दिला जाऊ शकत नाही. संजदमध्ये फूट पाडण्यासाठी 25-26 आमदारांची गरज भासणार आहे. तरच पक्षांतरबंदी कायदा त्यांच्यावर लागू होणार नाही. आणखीन काही आमदार संपर्कात येण्याची प्रतीक्षा राजदकडून केली जात आहे. समाजवादाचे समर्थक आणि लालूप्रसाद यादव यांच्या विचारसरणीनुसार वाटचाल करणाऱया आमदारांनाच प्रवेश देऊ असे उद्गार रजक यांनी काढले आहेत.
राजद नेत्यांकडून केवळ बडबड
रजक यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. संजदच्या वतीने प्रवक्ते राजीव रंजन प्रसाद यांनी भूमिका मांडली आहे. श्याम रजक लोकांमध्ये भ्रम निर्माण करत आहेत. संजद पूर्णपणे एकजूट असून पक्षाच्या आमदारांचा मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर विश्वास आहे. राजदने सर्वप्रथम स्वतःचे आमदार सांभाळावेत, कारण राजदच्या बहुतांश आमदारांना तेजस्वी यादव यांच्यावर विश्वास नाही. तेजस्वी गायब झाल्याने आमदार त्रस्त असल्याचे संजदच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.