तूर्तास कंपनीची आर्थिक स्थिती कमजोर, एसीजीएल व्यवस्थापनाची माहिती, सहकार्य करण्याचे कामगारांना आवाहन
प्रतिनिधी /वाळपई
एसीजीएल कंपनीच्या कामगार संघटनेने यापूर्वी दिलेल्या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार केलेला आहे. मात्र ज्या पद्धतीने कामगारांनी पगाराची वाढ व वेगवेगळय़ा प्रकारच्या सुविधांची केलेली मागणी सध्यातरी पूर्ण करणे शक्मय नाही. तरीसुद्धा व्यवस्थापन पगारवाढीच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करीत आहे. या कंपनीच्या उन्नतीसाठी व विकासासाठी कामगारांचे महत्त्वाचे योगदान आहे. हे विसरून चालणार नाही. मात्र सध्या कंपनीची आर्थिक परिस्थिती कमजोर आहे. यामुळे कामगारांनी यासंबंधी विचार करून कंपनी व्यवस्थापनाला सहकार्य करावे असे आवाहन कंपनीतर्फे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.
या पत्रकार परिषदेला कंपनीचे आर्थिक विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राघवेंद्र बुटाला, कंपनीचे अधिकारी दिलीप देसाई, प्रकाश नाईक यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना राघवेंद्र बुटाला यांनी सांगितले की, यापूर्वी पगारवाढीच्या संदर्भाचा करार अंमलात आलेला आहे. मात्र त्या करारानुसार कंपनीच्या कामगारांनी प्रतिदिन 10 बसेस बांधण्याची ग्वाही दिली होती. मात्र सध्याच्या तुलनेत फक्त दीड बस बांधण्याची प्रक्रिया पूर्ण होत आहे. त्यामुळे उर्वरित बसेस पूर्ण करण्यासाठी कंत्राटदार कामगारांचा वापर करावा लागत आहे. यामुळे कंपनीला जास्त पैसे खर्च करावे लागत आहेत. कंपनीच्या कामगारांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली असती तर कंपनीला कंत्राटदार कामगारांना अधिक पैसे द्यावे लागले नसते. यामुळे कंपनीला मोठा तोटा सहन करावा लागत आहे.
या कामगारांच्या मागणीबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही अनेकवेळा गांभीर्याने लक्ष घातले आहे. मात्र कामगारांचे समाधान होत नसल्यामुळे व्यवस्थापन काहीच करू शकत नाही. सध्या कामगारांनी पुकारलेल्या संपामुळे कंपनीला प्रतिदिन 30 लाखांचा तोटा सहन करावा लागणार आहे. पाच दिवसीय संपानंतर कंपनीला दीड कोटींच्या तोटय़ाला सामोरे जावे लागणार असून यामुळे आर्थिक परिस्थिती आणखी नाजूक होण्याची भीती राघवेंद्र बुटाला यांनी व्यक्त केली आहे. कंपनीचा भुईपाल येथील प्रकल्प बंद करून कंपनी व्यवस्थापन कंपनीची सर्व यंत्रणा धारवाड येथे हलवू पाहत आहे का या प्रश्नाला उत्तर देताना राघवेंद्र बुटाला म्हणाले की, तसा कोणताही निर्णय अजून पर्यंत व्यवस्थापनाने घेतलेला नाही. मात्र या प्रकल्पामध्ये समाधानकारक उत्पादन प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नसल्यामुळे अनेकवेळा धारवाड प्रकल्पाचा आधार घ्यावा लागत आहे.