वृत्तसंस्था/ कोलंबो
श्रीलंकेच्या उत्तर भागातील समुद्रात चालणारी बेकायदेशीर मासेमारी रोखण्यासाठी भारत आणि श्रीलंकेच्या नौदलांनी संयुक्त गस्त घालावी असा प्रस्ताव त्या देशाने ठेवला आहे. मात्र भारताने आधी भारताच्या सर्व मच्छीमारांची सुटका करावी अशी मागणी श्रीलंकेकडे केली असून प्रतिसादाची प्रतीक्षा केली जात आहे.
शुक्रवारी भारत आणि श्रीलंका यांच्या शिष्टमंडळांमध्ये या विषयावर चर्चा करण्यात आली. तामिळनाडूचे मच्छीमार श्रीलंकेच्या सागरक्षेत्रात बेकायदा येऊन मासेमारी करतात असा आरोप करण्यात आला. भारतानेही श्रीलंकेच्या भूमीकेवर नाराजी व्यक्त केली. तसेच श्रीलंकेचे मच्छीमारही भारताच्या सागरी कक्षेत घुसतात असा आरोप भारताने केला. यावर तोडगा काढण्यासाठी संयुक्त गस्तीचा प्रस्ताव मांडण्यात आला. भारताने तो अद्याप मान्य केलेला नाही. श्रीलंकेने भारताचे काही मच्छीमार ताब्यात घेतले असून त्यांची सुटका करावी अशी मागणी भारताने केली. त्यांची सुटका केली जाईल, असे आश्वासन त्या देशाने दिल्याचे समजते.
प्रत्येक वर्षी या काळात या दोन देशांमध्ये मासेमारीसंबंधीं वाद उद्भवतो. तथापि उभयमान्य तोडगा अद्याप सापडलेला नाहीं.