वार्ताहर / मांजरी :
संस्कारक्षम शिक्षणास प्राधान्य दिल्यास विद्यार्थ्यांना ध्येयनिश्चिती साध्य करता येते. यासाठी विद्यार्थ्यांनी ध्येयासक्त असले पाहिजे, असे विचार व्हीएसएम कॉलेजचे प्राचार्य सिद्धगौडा पाटील यांनी मांडले.
अंकली येथील केएलई शिक्षण संस्थेच्या शारदादेवी कोरे माध्यमिक शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन करताना ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी स्थानिक संचालक मंडळाचे सदस्य डॉ. आर. डी. गिजरे उपस्थित होते. उपप्राचार्य जे. एस. तमगौंड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी ज्येष्ठ शिक्षक के. बी. शिंदे, सांस्कृतिक विभाग प्रमुख व्ही. डी. नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. सी. बी. चौगुले यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.
मान्यवरांच्या हस्ते रोपास पाणी घालून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. एम. आर. नागराज, आर. एन. माने यांनी या कार्यक्रमास चालना दिली. संदेश वाचन एस. व्ही. अंगडी, सूत्रसंचालन आर. बी. द्यामनगौडर यांनी केले. एस. बी. कुंभार यांनी आभार मानले.