चित्रपट दिग्दर्शक प्रशांत सुर्वे यांची पत्रकार परिषदेत माहिती, जानेवारीत प्रेक्षकांच्या भेटीस
प्रतिनिधी/ मंडणगड
तमाशातील नाच्या या कलावंताच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट ‘सगुणा’चे संपूणं चित्रिकरण 20 सप्टेंबरपासून मंडणगड तालुक्यातील लिंबूकोंड या गावी सुरु होणार आहे, अशी माहिती या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत सुर्वे यांनी लिंबूकोंड येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या चित्रपटाचे कथानक, कलाकार, संगीत आदी विषयांवर पत्रकारांशी संवाद साधताना ते पुढे म्हणाले, सगुणा या मराठी कादंबरीवर आधारित या चित्रपटाच्या कथानकाचा विषय असून तो तीस वर्षापूर्वीचा आहे. अविष्कार थिएटरच्या माध्यमातून दाक्षिणात्य व मराठी चित्रिकरणाचा संगम असलेला हा चित्रपट सोनी टी. व्ही. मराठीच्या माध्यमातून जानेवारी महिन्यात प्रेक्षकांचा भेटीस येणार आहे. अभिनेता अंशुमन विचारे या चित्रपटात मुख्य भूमिका करणार असून मैथिली वारंग, नुपूर काळे, संजय खापरे, झाकीर शेख, किरण मारते, प्रसाद पुजारी, सहदेव राठोड, शुभम पवार, सुनील गोडबोले हे कलाकारही या चित्रपटात महत्वाची भूमिका करणार आहेत.
संजय गायकवाड यांनी चित्रपटातील गाण्यांना संगीत दिले असून गाण्याचा म्युझीम अल्बम या आधीच लाँच करण्यात आला आहे. मराठी, हिदी व अनेक दक्षिणात्य चित्रपटांचे चित्रिकरण करणारे कॅमेरामन बी. सुरेश या चित्रपटाचे चित्रिकरण करणार आहेत. लिंबूकोंड या गावात सुमारे 25 दिवस संपूर्ण चित्रपटाचे चित्रिकरण होणार असून चित्रपटासाठी लागणारे सर्व लोकेशन वाडीतच आहेत. कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक सेट येथे उभारले जाणार आहेत. एखाद्या चित्रपटाचे चित्रिकरण होण्याची मंडणगड तालुक्यातील ही पहिलीच वेळ असून स्थानिक कलावंत गेल्या 2 वर्षांपासून या चित्रपटाच्या चित्रिकरणाची प्रतीक्षा करत आहेत.
पूर्ण वाडीतील सर्व नागरिकांचा चित्रिकरणासाठी हातभार लागणार आहे. स्थानिक पातळीवर अप्पा कदम, सुधीर कदम, चंद्रकांत धनावडे, सरपंच विकास कासारे, शांताराम कदम, कोमल राठोड, काजल आमरसकर, दत्तप्रसाद गांगण यांना या चित्रपटात काम करण्याची संधी मिळणार आहे. तमाशाचे कथानक पश्चिम महाराष्ट्रातील फडाच्या लावणीच्या तमाशावर आधारित असले तरी लिंबूकोंड येथील लोकशेन या चित्रपटासाठी साजेसे आहे. या एकाच लोकेशनवर पूर्ण चित्रपट चित्रित केला जाणार आहे. दोन वर्षापूर्वी या गावातून आवश्यक असणारे विविध शॉट्स चित्रित करण्यात आले होते. त्यावेळी स्थानिक कलाकारांची विविध भूमिकांसाठी ऑडिशन व निवड करण्यात आली होती. त्यामुळे या चित्रपटात काम करण्याची येथील सर्वसामान्यांची अपेक्षा यानिमित्ताने पूर्ण होणार आहे. या चित्रपटाचा पाया लावणी कला आहे. चित्रपटातील तिन्ही लावण्या एका कलाप्रेमी महिला पोलीस अधिकाऱयाने लिहिलेल्या असल्याची माहिती दिग्दर्शक सुर्वे यांनी दिली.
तमाशातील नाच्या या पात्राचे खरे आयुष्य संघर्षमय असते. त्याच्या जीवनातील विविध समस्या व त्या सोडवण्यासाठी त्याला करावा लागणारा संघर्ष या विषयावर हा चित्रपट आहे. नाच्या या पात्राला कथेचा नायक मानून हाताळण्यात आलेले फारच कमी चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत आतापर्यत निर्माण झाले आहेत. त्यामुळे हा अतिशय आव्हानात्मक विषय हाताळण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला आहे. चित्रिकरणासाठी महाराष्ट्र व दक्षिण अशा दोन्हीकडील चित्रिकरणाच्या पध्दतीचा वापर करण्यात येणार आहे. यातून फाईट सीन व अन्य प्रसंग अधिक बोलके करण्यावर भर राहणार आहे. चित्रपटाचा नायक सगुणाच्या भूमिकेत अंशुमन विचारे काम करणार असून त्यासाठी गेले 3 महिने तो विशेष मेहनत घेत आहे. वेगळा विषय असल्याने पूर्ण टीम या विषयासाठी गेली 3 वर्षे मेहनत घेत आहे, असे सुर्वे यांनी सांगितले.