अध्याय दहावा
ब्रह्ममय होण्यासाठी वर्णाश्रम धर्मानुसार वाटय़ाला आलेले काम निरपेक्षतेने कर आणि या विपरीत काही करावेसे मनात आले तर माझ्या नामाचा गजर कर असा कानमंत्र भगवंतांनी उद्धवाला दिला. पुढे म्हणाले, या पद्धतीने वागत गेलास तर तुझे चित्त शुद्ध होऊन तुझ्यातील सत्त्वगुणाची वाढ होईल. त्यामुळे तुला माझ्याशिवाय इतर गोष्टी तुच्छ वाटून तू सतत माझे चिंतन करू लागशील आणि सर्वत्र मीच भरून राहिलो आहे
याची अनुभूती तुला येऊ लागेल. हे जरी मी तुला सांगितले तरी ही गोष्ट घोटवून घेण्याचे काम सद्गुरु करतात. सद्गुरुंवर भक्ती जडण्यासाठी अहिंसा, सत्य, इत्यादींचे अविश्रांत आचरण करावे. अहिंसा-सत्यादिकांचे आचरण करीत असताना साधकाची स्थिती अशी काही उज्ज्वल होते की, गुरुभक्तीवर त्याचे अत्यंत प्रेम जडते, तो रात्रंदिवस गुरुचेच चिंतन करू लागतो. सद्गुरुशिवाय ब्रह्मज्ञान कधीच प्राप्त व्हावयाचे नाही, असे प्रमाण उपनिषद्वाक्मयांनी अखेरचा निर्णय म्हणून सांगितले आहे.
मी तुझे स्मरण करतोय मग गुरुंची काय आवश्यकता असे म्हणशील तर नाव पाण्यात तारून नेते हे सत्य पण कितीही महान माणसे त्यात बसली असली तरी नावडय़ाशिवाय ती पुढे जाऊच शकत नाही. गुरु नावडय़ाचेच काम करतात. अकस्मात एखादे रत्न सापडते पण ते खरे की खोटे असा संशय उत्पन्न होतो. तेथे रत्नपरीक्षक येऊन त्याचे मोल करतो, तेव्हा मग ते मिळविण्याविषयी लोक खटपट करतात.
त्याप्रमाणे आत्मस्वरूप हे आयतेच हातात असते, श्रद्धापूर्वक सद्गुरुच्या हाताने, ज्ञाते त्या आत्मसुखाला पात्र होतात. आत्मज्ञान संपादन करण्याकरिता सद्गुरुची सेवा करून संत सज्जन शांत होतात. कारण सद्गुरु हा आनंदघन असतो. त्यांना चिद्ªपाचे ज्ञान झालेले असल्याने तो परिपूर्ण चिद्ªपच असतो. गुरु आणि ब्रह्म भिन्न नव्हेत असे उपनिषद सांगते. सद्गुरु हे माझेच सगुण रूप समज.
सच्चिदानंदाचा सोहळा प्रत्यक्ष डोळय़ांनी पहावा म्हणून लीलेनेच सद्गुरुनी देह धारण केलेला असतो. त्यांची भेट व्हायला कोटी भाग्य पदरी पाहिजे. असे सहजी ते भेटतील अशातलीही गोष्ट नाही. सद्गुरुंचे महात्म्य असे की, सद्गुरु जिकडे दृष्टी फेकतात तिकडे सुखाचीच सृष्टी उत्पन्न होते. ते म्हणतील तेथे महाबोध स्वानंदाने राहतो. अशा सद्गुरुंचे पाय पाहिले की, तहान-भूक तत्काळ नाहीशी होते. कारण गुरुच्या चरणी निजसुख असते. सद्गुरुंचे लक्षण सांगताना शब्दच खुंटून जातात. कारण ते सनातन पूर्णब्रह्मच असतात. त्यांची खूण काय सांगणार? तथापि, एक खूण नक्की सांगता येते. ती म्हणजे त्याच्या ठिकाणी सर्वतोपरी शांति मात्र दिसते.
उद्धवा! शांति म्हणजेच समाधान, ब्रह्मज्ञान आणि पूर्णब्रह्म होय असे तू निश्चित समज. सद्गुरुंबद्दल भगवंतांनी सांगितलेले लक्षात आले की साधकाच्या मनात सद्गुरुबद्दल प्रेम दाटून येते आणि सद्गुरु कधी भेटतील असे त्याला होऊन जाते. तो गुरुंच्या शोधाला लागतो. त्याचे अंतःकरण त्याला विसावा घेऊ देत नाही. अष्टौप्रहर गुरुंचेच चिंतन तो करू लागतो. त्यांना मी केव्हा पाहीन? हा माझा पाश केव्हा सुटेल? मनाला शांती कधी येईल अशा विचारांनी तो सद्गुरुसाठी वेडा होऊन
जातो.
आयुष्य बघता बघता संपत आले, अजून मला सद्गुरुंची भेट होत नाही. मनुष्यदेह निघून गेला म्हणजे सारेच बुडेल असे त्याला वाटू लागते. सद्गुरु प्रत्यक्ष भेटले नाहीत तर मनानेच गुरुनाथाची पूजा करतो आणि परमभक्तीने पूजा करताना त्याला एवढे प्रेम उचंबळते की, ते हृदयात मावत नाही. सद्गुरुची भेट व्हावी म्हणून तो तीर्थे आणि तपोवने हिंडत असतो. नित्य कर्में करीत असताही मनातून एक क्षणभरसुद्धा गुरुंचा विचार त्याच्या मनातून जात नाही. सद्गुरुंची अशी आवड ज्याला असते, त्याची आस्था चढाओढीने वाढतच जाते. ती पाहून त्याला तत्काळ गुरुच्या रूपाने मीच प्रत्यक्ष भेट देतो.