अध्याय बारावा
भगवंत उद्धवाला म्हणाले, यथाशास्त्र म्हणजे ब्रह्मचर्याश्रमात वेदाध्ययन करावे. गृहस्थाश्रमात अग्नीची आणि ब्राह्मणाची पूजा करावी. वानप्रस्थाश्रमात संसारातील लक्ष काढून घ्यावे आणि जास्तीतजास्त काळ ईश्वरस्मरणात घालवावा. अशा अनुक्रमाने वागले असता क्रमाने मुक्तिस्थान म्हणजे ब्रह्मस्थान प्राप्त होते. सकाम कर्मे करून स्वर्ग मिळेल पण त्याने पुनर्जन्म चुकत नाही. आता संन्याशाची सुखप्राप्ती ऐक. ते ही दोन्ही फळे मिथ्या आहेत असे समजतात. त्रिभुवनामध्ये सर्वत्र मीच एकमेव आहे असा अनुभव निश्चयपूर्वक त्यांना आलेला असतो. हा जो अनेक रूपांनी पसरलेला विस्तार दिसतो, तो खरोखर मी चिदात्माच आहे, असा निश्चय गुरुमुखाने जाणून घेऊन त्यांनी आत्मसुख मिळवलेले असते. ते मत्स्वरूप होऊन मला पावतात, सुखरूप होतात आणि संसारात येण्यापासूनही सुटतात. संसार हा मायामय असल्यामुळे मिथ्या, भासरूप आहे असे जो जाणतो, तोच वेदवेत्ता व विद्वान् होय. त्यालाच परमहंस म्हणतात. तो विश्व हेच आपले घर समजून रहात असतो. अशा पदाची प्राप्ती होण्याला अनन्यभावाने गुरुभक्ति करावी. त्यानेच संसाराची निवृत्ती होईल. सतसंगतीचे महत्व आहेच. सतसंगती माझ्या पदाची प्राप्ती करून देते. तसेच गुरुभक्तीही माझे पद मिळवून देते. गुरूंची सेवा आणि अनन्य भक्तीने तू ज्ञानाची कुऱहाड धारदार कर आणि तिने सावधपणे आपला जीवभाव तोडून टाक. अशा रीतीने आत्मस्वरूप होऊन ती कुऱहाड टाकून दे. भिन्न भिन्न प्रकारची कोटय़वधी साधने केली आणि सद्गुरूचे भजन केले नाही तर संसारवृक्षाचे छेदन व्हावयाचे नाही. संसारवृक्षाला छेदणारी केवळ एक गुरुभक्तीच आहे असे समज. पातक नष्ट करण्यास ज्याप्रमाणे गंगाजळ समर्थ आहे, त्याप्रमाणे गुरुभक्ति हीच संसारभयाचे भस्म करते हे निश्चयपूर्वक लक्षात ठेव. सत्यव्रताचे ग्रहण केले म्हणजे पातक आपोआप पळून जाते, त्याप्रमाणे गुरूचे भजन केले असता संसाराचा क्षय आपोआपच होतो. मारुती दृष्टीस पडला असता भुते बारा वाटांनी पळतात त्याप्रमाणे गुरुभजनाचा तडाखा सुरू झाला की, संसाराचे भय हा हा म्हणता पळून जाते. मरताना अमृतपान घडले तर मरणालाच मरण येते, त्याप्रमाणे गुरुभजन केले असता जन्ममरण मरून जाते. अंतकाळी अकस्मात ‘हरि’ असे म्हटले असता यमदूतांनाही लाथ बसते, त्याप्रमाणे सद्गुरूचे भजन केले असता भवभयाला लाथाच बसतात. संसाराचे निर्दालन करण्यासाठी मुख्यतः गुरूचे भजन करावे, हेच साधन श्रे÷ आहे. गुरुभक्त असतो तो मोठा भाग्यवान् होय. उद्धवा ! सद्गुरु वेद व ब्रह्मज्ञान यात निष्णात असून शिष्याला ज्ञान देण्याविषयी समर्थ असतो, असे येथे निश्चयपूर्वक समज. जो स्वरूपामध्येच समाधान करतो, तोच खरोखर सद्?गुरु होय. त्या सद्गुरुभजनाचा प्रकार तुला मी निश्चयेकरून सांगतो. जो गुरुभजन करतो, तो सर्व कर्म व धर्म निभावणाऱयांपेक्षाही थोर होय.
गुरु पित्यासमान म्हणावा तर पिता एकाच जन्माचा असतो परंतु सद्गुरु हा सनातन मायबाप आहे. तो सर्व जगाचा पिता आहे. गुरु मातेसमान समजावा, तर गर्भ जन्मल्यामुळेच तिचे प्रेम जडते, परंतु गुरुराज हा गर्भवासाचे निवारण करतो व पुत्राहूनही अधिक प्रेम करतो. पोटातून बाहेर पडल्यानंतर पुत्रस्नेहाने आई त्याच्यावर प्रेम करावयास लागते पण गुरुमाता ही बाहेरचे सर्व पोटात घालून स्नेहाने जास्त प्रेमळ असते. गुरु धन्याप्रमाणे मानावा, तर धन्याला काही मरण चुकविता येत नाही, परंतु सद्?गुरु तर जन्ममरणच चुकवितो म्हणून गुरुराज हाच सर्वस्वी खरा धनी आहे. गुरु कुलदेवता मानावी, तर कुलदेवतेला केवळ कुलधर्मांत पूज्यता असते, परंतु गुरु हा कुलदेवतेचीही देवता आहे. आपल्या प्रत्येक कर्मांत त्याला पूज्यत्व आहे. गुरु कल्पतरूसमान मानला तर कल्पतरु हा कल्पना करावी तेवढेच दान देतो, परंतु सद्गुरु हा पूर्ण निर्विकल्पताच देतो. ती निर्लोभता दिल्याने फार मोठे दान दिल्याप्रमाणे होते. चिंतामणी हा ज्या गोष्टीचे चिंतन करावे तेवढीच वस्तु देतो. परंतु सद्गुरु हा मुळी चिंतेचाच नाश करतो व चित्ताला मारून चैतन्याचे शाश्वत निजदान देतो.
क्रमश ः