पालकमंत्री उदय सामंत यांचे आवाहन : वाढदिवस कार्यक्रमानिमित्त महारक्तदान शिबीर, कोरोनायोद्धय़ांचा सत्कार
प्रतिनिधी / कणकवली:
शिवसेनेचे नेते संदेश पारकर यांचे काम पाहून आम्ही काम करायचो. पारकर यांना योग्य पद मिळून त्यांचा सन्मान व्हावा, अशी इच्छा आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केली आहे. यासाठी आमच्याकडून मदत लागणार असेल तर आम्ही हात आखडता घेणार नाही. संदेश पारकर यांची कामाची पद्धत, विरोधकांचेही चांगले व्हावे, ही भावना आदर्शवत आहे. त्यांना योग्य न्याय मिळण्यासाठी आम्ही पाठपुरावा करूच, पण गेली 30-35 वर्षे सुरू असलेला सामाजिक कार्याचा हा वसा सोडू नका, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त येथील मातोश्री मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात सामंत बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, महिला आघाडी जिल्हाप्रमुख नीलम सावंत-पालव, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, अवधुत मालणकर, संदेश पटेल, ऍड. हर्षद गावडे, नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, सुमेधा अंधारी, रुपेश नार्वेकर, बाळा भिसे, जि. प. सदस्य संजय आग्रे, स्वरूपा विखाळे, राजलक्ष्मी डिचवलकर, गितेश कडू, विकास कुडाळकर, उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, विलास साळसकर, संतोष शिरसाट, अतुल बंगे, राजू राठोड, अनंत पिळणकर, भास्कर परब, विलास कोरगावकर, शेखर राणे, शिवाजी घोगळे, प्रसाद अंधारी, आनंद मर्ये व इतर उपस्थित होते.
कोविडयोद्धय़ाचा सन्मान हे पुण्यकर्मच!
सामंत पुढे म्हणाले, राजकारणात संयमाने घ्यावे लागते. यशापयश नशिबावर अवलंबून असते. तुमच्या पाठिशी कार्यकर्त्यांचा ठेवा आहे. तालुका पदाधिकाऱयांनी याठिकाणी केलेले आयोजन कौतुकास्पद आहे. सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन, महारक्तदान शिबीर आयोजित करून पारकर यांनी चांगला आदर्श घालून दिला आहे. त्यांनी कोविडयोद्धय़ांचा सत्कार आयोजित केला हे पुण्यकर्म आहे. गेली 30-35 वर्षे त्यांनी या सामाजिक कामाचा वसा टिकवून ठेवला आहे. रात्री-अपरात्री कधीही मदतीसाठी गरज लागल्यास पारकर धावून येतात. त्यांचा हा उपक्रम 100 व्या वाढदिवसापर्यंत असाच चालू राहू दे, असे ते म्हणाले.
पारकरांना मानाचे पद मिळावे – आमदार वैभव नाईक
आमदार नाईक म्हणाले, सामाजिक कार्याच्या माध्यमातून पारकर गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ लोकांपर्यंत पोहोचत आहेत. पारकर यांना मानाचे पद मिळेल, अशी घोषणा दरवर्षी वाढदिनी होते. मात्र, आता घोषणा नको, पालकमंत्र्यांनी वर्षभरात पद मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा. मात्र, पारकरांचे जनतेच्या हृदयात व मनात जे स्थान आहे, हीच त्यांच्या कामाची पोचपावती आहे.
पद असो नसो समाजसेवेचे व्रत सोडणार नाही – पारकर
संदेश पारकर म्हणाले, गेली 30-35 वर्षे आपण हे उपक्रम राबवितो याचे आपण साक्षीदार आहात. समाजसेवेचे व्रत अंकीकारून आपण हे काम करत आहे. समाजाचे काही देणे लागतो या भावनेने काम करतो. म्हणूनच कोरोना महामारीत जे लढले, त्यांचा सत्कार आपण आयोजित केला आहे. या मतदारसंघात सुमारे एक हजारजणांचा सन्मान केला आहे. आपल्याकडे पद असो वा नसो आपण समाजसेवेचे व्रत सोडणार नाही. मात्र, आपणाला संधी दिलात तर त्याचे सोने करेन. आपण अनेक आव्हाने पेललीत. त्यामुळे कसलीही भीती वाटत नाही. द्याल ती जबाबदारी पार पाडू. एकदा विश्वास टाका, विश्वासाला पात्र ठरून दाखवीन. मात्र, आपण सर्वांचे प्रेम हीच आपली उर्जा आहे.
अरुण दुधवडकर म्हणाले, राजकीय दहशतीच्या विरोधात लढणारे संदेश पारकर आहेत. त्यांना शिवसेनेत आल्यानंतर पक्षात योग्य मान, सन्मान मिळत असून भविष्यात त्यांना चांगल्या पदाची जबाबदारी सोपवली जाईल.
सतीश सावंत म्हणाले, संदेश पारकर यांनी सामाजिक कार्याचा जोरावर जिह्यात स्वतःची स्वतंत्र ओखळ निर्माण केली आहे. सर्वसामान्यांच्या सुख व दुःखात ते नेहमीच सहभागी होत असतात. त्यामुळे जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम आहे. जिह्याच्या व कणकवली शहराच्या विकासासाठी ते अहोरात्र झटत आहेत. राजकीय क्षेत्रात काम करताना त्यांनी जनतेशी असलेली नाळ अद्यापही तुटू दिलेले नाही.
संजय पडते म्हणाले, संदेश पारकर यांनी आपल्या राजकीय प्रवासात खूप मोठा संघर्ष केला आहे. त्यांची काम करण्याची पद्धत पहाता त्यांच्याकडे भविष्यात त्यांच्याकडे चांगले पद चालून येईल. अमित सामंत म्हणाले, संदेश पारकर यांची राजकीय कार्यकिर्द राष्ट्रवादी पक्षातून सुरू झाली. संदेश पारकर यांचा संघर्षाचा मी साक्षीदार असून राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यांनी अनेक विकासकामे करून घेतली आहे. तसेच ज्यावेळी मी आणि माझे सहकारी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे भेटण्यास जातो, तेव्हा नेत्यांकडून संदेश पारकर कसे आहे, अशी विचारपूस केली जाते.
यावेळी कोरोना काळात अविरत सेवेबद्दल डॉक्टर, परिचारिका, आशासेविका, वायरमन, पोलीस कर्मचारी, सरपंच, ग्रा. पं. सदस्य, पत्रकार यांचा कोरोनायोद्धा म्हणून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
रक्तदात्यांचे शतक
यावेळी कै. सुबोध टिकले स्मरणार्थ आयोजित महारक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यात कोविडबाबतचे सर्व नियम पाळत 101 दात्यांनी रक्तदान केले.