समांतर सभेत विरोधकांचा आरोप, विषय पत्रिकेवरील सर्व विषय नामंजूर
प्रतिनिधी/कसबा बावडा
राजराम कारखान्यात सत्ताधाऱयांची मनमानी सुरु असून सर्वसाधण सभासदांचा आवाज दाबून सभा गुंडाळली असा आरोप राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या समांतर सभेत केला. सत्ताधाऱयांची ही शेवटची सभा असून निवडणुकीत त्यांना उमेदवार मिळणार नाहीत असा संताप सभेत विरोधी सभासदांनी व्यक्त केला. वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर विरोधकांनी श्रीराम मंगल कार्यालयातील सांस्कृतिक हॉलमध्ये समांतर सभा घेतली. अध्यक्षस्थानी गोकुळचे संचालक एस. आर. पाटील होते.
निवडणूक जवळ आली की सभासदांची काळजी वाटणाऱया सत्तारुढ गटाने वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी विचारलेल्या बारा प्रश्नांना योग्य उत्तरे का दिली नाहीत अशी विचारणा शिरोलीचे सरपंच शशीकांत खवरे यांनी केली. ते म्हणाले, पुढील काळात होऊ घातलेल्या निवडणूकीत कारखान्यातील सत्तारुढ गटाला स्वतचा पराभव दिसू लागला असून येत्या निवडणूकीत पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन आघाडीचीच सत्ता येईल असा विश्वास खवरे यांनी व्यक्त केला. अध्यक्षपदावरुन बोलताना एस. आर. पाटील यांनी महाडिक यांच्या कार्यपद्धतीचा पाढा वाचला ते म्हणाले, हुकमशाही कारभाराला गोकुळच्या सभासदानी बाहेरचा रस्ता दाखवला आता राजारामध्येही ही प्रवृत्ती हद्दपार होणार आहे, त्यामुळे त्यांना विनाशकाले विपरीत बुद्धी सुचत आहे. अशी टीका केली. सभासदांनी सभेवर जोरदार आक्षेप घेतले. रघुनाथ चव्हाण, किरण भोसले, दगडू चौगले, बाबासाहेब देशमुख, अशोक पवार आदि सभासदांनी आपली मते मांडल़ी. यावेळी माजी ज़ि प़ सदस्य बाजिराव पाटील, श्रीराम विकास सेवा संस्थेचे चेअरमन हरी पाटील, व्ह़ाईस चेअरमन संतोष पाटील, मोहन सालपे, धनाजी गोडसे, विजय उलपे, रणजीत उलपे, प्रदिप उलपे तसेच कारखाना सभासद उपस्थित होत़े
कारखान्याचा कामगार घरगडी
हुकुमशाही प्रवृत्तीमुळे कामगारांमध्येही दहशत आहे. काही कामगारांना संचालकांच्या घरात घरगडी म्हणून राबवून घेतले जात आहे. त्यांना कारखान्याचा पगार देऊन वैयक्ति कामासाठी संचालकांकडून वापर होत आहे. असा आरोप पुलाची शिरोलीतील सभासद सुनिल पाटील यांनी केली.