समस्या जैसे थे, चिखलातून काढावी लागतेय वाट
प्रतिनिधी /बेळगाव
सध्या पावसाची रिपरिप सुरू असल्याने सर्वत्र पाणीच पाणी होऊन सखल भागात पाणी साचून राहिले आहे. अनेक ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण केले नसल्याने नागरिकांना वेगवेगळय़ा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. समर्थनगरमध्ये रस्त्यावर पाण्याची डबकी तयार होऊन चिखलाचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे.
संपूर्ण रस्त्याची वाताहत झाली असून चिखलातूनच वाट काढावी लागत आहे. अनेक वाहने चिखलात घसरून पडण्याच्या घटनादेखील वाढल्या आहेत. याबरोबरच घरासमोरच चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे देखील मुश्कील बनले आहे. त्यामुळे नागरिकांना येथून ये जा करताना कसरत करावी लागत आहे. या रस्त्याकडे वेळीच लक्ष देऊन नागरिकांची समस्या प्रशासनाने लवकरात लवकर सोडवावी, अशी मागणी होत आहे.