कृष्णात चौगले / कोल्हापूर
सरकारी दवाखाने म्हणजे स्वयंघोषित गावपुढाऱयांच्या राजकारणाचे अड्डे बनले आहेत. `चार हाणा, पण पुढारी म्हणा’ असे म्हणणाऱया या पुढाऱयांकडून थेट पाच वर्षाची शैक्षणिक तपश्चर्या करून एमबीबीएस झालेल्या वैद्यकीय अधिकाऱयांवर चुकीचे आरोप केले जात आहेत. याच गावपुढाऱयांकडून प्रा.आ.केंद्रांमधील कामचुकार आणि गैरकारभार करणाऱया कर्मचाऱयांना मात्र `अर्थ’पूर्ण घडामोडींतून पाठींबा दिला जात आहे. त्यामुळे तेथे शिस्त लावणारे वैद्यकीय अधिकारी कसे चुकीचे आहेत, हे सिद्ध करण्यासाठी त्यांच्यावर चुकीचे आरोप केले जात आहेत. आणि ते आरोप गृहित धरून आरोग्य विभागाकडून चौकशी केली जाते. त्यामुळे कर्तव्यदक्ष आणि निर्दोष वैद्यकीय अधिकाऱयांना दोषी ठरविण्याचा चुकीचा पायंडा पडला आहे. साहजिकच वैद्यकीय अधिकाऱयांवरील सततच्या ताणतणावामुळे रुग्णसेवेवर परिणाम होत आहे.
जिह्यातील प्रत्येक गावात कमी अधिक प्रमाणात स्वयंघोषित गावपुढारी आहेत. ज्यांना आपल्या कुटूंबाचे पालनपोषण करण्याची अक्कल नाही, क्षमता नाही, ते गावच्या चौकात अथवा पारावर बसून वैद्यकीय अधिकाऱयांच्या कामकाजाचे मोजमाप करतात. आपण कार्यालयामध्ये गेल्यानंतर त्यांनी मानाचा `मुजरा’ करावा अशी त्यांची एकतर्फी मागणी असते. या मुजऱयाबरोबरच त्यांना `चिरीमिरी’चे देखील व्यसन लागले आहे. `अर्थाअर्थी’ संबंध न ठेवणारे वैद्यकीय अधिकारी कसे चुकीचे आहेत, त्यांचा काटा कसा काढायचा याचे षडÎंत्र त्यांच्याकडून रचले जाते. त्यामुळे एखाद्या वेळेस वैद्यकीय अधिकारी प्रशासकीय कामानिमित्त थोडावेळ जरी दवाखान्यामध्ये उपस्थित नसले, तर डॉक्टर गैरहजर असतात म्हणून विनाकारण गदारोळ करण्याचा प्रयत्न केला जातो. आंदोलने करून प्राथमिक आरोग्य केंद्रातील कामकाजाबाबत आपण किती जागरूक आहोत हे स्थानिकांना दाखविण्याचा प्रयत्न केला जातो. वैद्यकीय अधिकाऱयांच्या कामाच्या तासावरून तर त्यांना `ब्लॅकमेल’ केले जात आहे. त्यामुळे अशा गावपुढाऱयांनी वैद्यकीय अधिकाऱयांबाबत एखादी तक्रार केल्यास त्याबाबत कितपत गांभिर्याने विचार करावा, याबाबत आरोग्य प्रशासनानेही निर्णय घेण्याची गरज आहे.
विशेष बाब म्हणजे अशा फुटकळ कार्यकर्त्यांच्या मागणीवरून पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांबरोबरच आमदारांकडूनही चांगले काम करणाऱया वैद्यकीय अधिकाऱयांवर कारवाई करण्याची प्रशासनाकडे मागणी केली जात आहे. त्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकाऱयांना धारेवर धरले जात आहे. परिणामी लोकप्रतिनिधिंच्या ससेमिऱयातून मुक्त होण्यासाठी आरोग्य विभागाकडून डॉक्टरांचा बळी दिला जात आहे. त्यामुळे डॉक्टरांचा `दुष्काळ’ असलेली जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा चुकीच्या फेऱयात अडकली आहे.
गैरकारभार करणाऱया आरोग्य कर्मचाऱयांची दहशत
पन्हाळा तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकामधील काही आरोग्य कर्मचाऱयांच्या गैरकारभारास तेथील वैद्यकीय अधिकाऱयांनी लगाम घातला. परिणामी त्यांच्या कामामध्ये काही `अर्थ’ उरला नसल्यामुळे ते आक्रमक झाले आहेत. काही स्वयंघोषित गावपुढाऱयांना हाताशी धरून आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची दिशाभूल करून त्यांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱयाची बदली करण्याचा `विडा’ उचलला आहे. त्यासाठी त्यांनी आरोग्य विभागाकडे चुकीच्या पद्धतीने तक्रारी देखील दिल्या आहेत. त्या तक्रारीनुसार चौकशी देखील झाली. संबंधित चौकशीमध्ये स्थानिक नागरीकांकडून वैद्यकीय अधिकाऱयाबाबत मत आजमावले. पण त्यामध्ये डॉक्टरांविषयी चांगल्या प्रतिक्रिया आल्याचे त्या वादग्रस्त कर्मचाऱयांना समजले. त्यामुळे त्यांनी चक्क गावपुढाऱयांमार्फत चौकशी अधिकाऱयांवर दबाव आणून संबंधित डॉक्टारांच्या विरोधात ग्रामस्थांच्या तक्रारी असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या चौकशीतून काय निष्पन्न होणार ? हे आगामी काळातच समजणार असले तरी गैरकारभार करणाऱया कर्मचाऱयांची किती दहशत आहे, हे त्याद्वारे स्पष्ट झाले आहे.
इंजेक्शन घेऊ नका, किडण्या फेल होतील !
एखादा वादग्रस्त आरोग्य कर्मचारी वैद्यकीय अधिकाऱयांना बदनाम करण्यासाठी कोणत्या थराला जाईल हे आकलनापलिकडचे बनले आहे. पन्हाळा तालुक्यातील एका आरोग्य पथकामधील आरोग्य सेविकेने आपले दुष्कृत्य लपविण्यासाठी रुग्णाला चुकीच्या पद्धतीने सावधानतेचा इशारा दिला आहे. सर्दी, ताप असलेला एक रुग्ण उपचारासाठी पथकामध्ये आल्यानंतर त्याला वैद्यकीय अधिकाऱयांकडून इंजेक्शन घेऊ नका, तुमच्या किडण्या फेल होतील अशी भिती घातली. त्यामुळे संबंधित रुग्ण उपचार न घेताच तेथून बाहेर पडला.
अधिकारी व लोकप्रतिनिधींनी तक्रारींची खातरजमा करण्याची गरज
एखादा आरोग्य कर्मचारी वैद्यकीय अधिकाऱयांबाबत तक्रार घेऊन आल्यानंतर त्यामागे त्याचा कोणता उद्देश आहे ? मुलत: त्याची कार्यपद्धती कशी आहे ? त्याच्या तक्रारीमागे काय हेतू आहे ? त्याला पाठींबा देणारे स्वयंघोषित गावपुढाऱयांचे चारित्र्य कसे आहे ? आदी बाबींची उलटतपासणी करूनच तक्रारींची चौकशी करायची की नाही, हे निश्चित करण्याची गरज आहे. अन्यथा आरोग्य यंत्रणेच्या मूळ कामाऐवजी `चौकशी करणे’ हेच मुख्य काम बनेल.
वैद्यकीय अधिकाऱयांकडून आरोग्य कर्मचाऱयांना हवी सन्मानाची वागणूक
जिह्याच्या आरोग्य यंत्रणेमध्ये बहुतांशी आरोग्य कर्मचाऱयांचे उल्लेखनीय काम आहे. पण काही गैरकारभार करणाऱया कर्मचाऱयांमुळे सर्व आरोग्य यंत्रणा बदनाम होत आहे. पण जे कर्मचारी कामचुकारपणा न करता उत्कृष्ट सेवा देत आहेत, त्यांना वैद्यकीय अधिकाऱयांकडूनही सन्मानाची वागणूक मिळणे अपेक्षीत आहे. अन्यथा प्राथमिक आरोग्य केंद्रे ही आरोग्य सेवा देणाऱया मंदिराऐवजी कुरघोडÎांच्या राजकारणाचे अड्डे बनतील.