भाजप आमदारांकडून पत्रकार परिषदेत माहिती : मुख्यमंत्रीपदी डॉ. प्रमोद सावंतच कायम : स्थीर, कार्यक्षम, भ्रष्टाचारमुक्त सरकार देणार
प्रतिनिधी / पणजी
भाजपमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, सर्व आमदार एकसंध आहेत. मुख्यमंत्रीपदाचाही कोणताही वाद नाही. डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वावर सर्वांचा विश्वास आहे व तेच मुख्यमंत्रीपदी कायम राहणार यावर केंद्राकडूनच शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवसात दिमाखदार सोहळ्यात सरकारचा शपथविधी होईल. त्यानंतर जे सरकार स्थापन होईल ते स्थीर, कार्यक्षम, भ्रष्टाचारमुक्त व लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणारे परिपूर्ण सरकार असेल, असे प्रतिपादन आमदार सुभाष फळदेसाई यांनी केले आहे.
भाजपला लोकांनी स्पष्ट बहुमत दिलेले असतानाही अद्याप सरकार स्थापन होत नसल्याबद्दल आमदार दिगंबर कामत यांनी भाजपवर टीका केली होती. त्याला उत्तर देण्यासाठी भाजपतर्फे पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत फळदेसाई बोलत होते. त्यावेळी आमदार गोविंद गावडे, नीळकंठ हळर्णकर, दाजी साळकर यांची उपस्थिती होती.
कामतांनी काँग्रेसची चिंता करावी
भाजपला केवळ 33.32 टक्के एवढेच मतदान झाले व उर्वरित मतदार भाजपच्या विरोधात गेले, या काँग्रेसच्या दाव्यात तथ्य नाही. उलटपक्षी यंदा लोकांनी भाजपचे 50 टक्के आमदार विजयी करून स्पष्ट बहुमत दिले आहे. तसेच गत निवडणुकीपेक्षा मत टक्केवारीही 1 टक्क्यापेक्षा जास्त वाढली आहे, असा दावा फळदेसाई यांनी केला. त्यामुळे दिगंबर कामत यांनी भाजपची चिंता करण्याची गरज नाही. काँग्रेसच्या खालावलेल्या मत टक्केवारीची त्यांनी चिंता करावी. त्याचबरोबर ही हालत पाहून पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीला गोवा प्रदेशाध्यक्षांना हाकलावे लागले, याचाही कामत यांनी विचार करावा, असा सल्ला फळदेसाई यांनी दिला.
मोदी, भाजपवर जनतेचा विश्वास
भाजपने पाच राज्यात निवडणूक लढविली. त्यातील पंजाब वगळता सर्व राज्यात लोकांनी स्पष्ट बहुमत दिले ते पाहता नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर सर्वांचा विश्वास असल्याचे स्पष्ट होते. गोव्यात तर गत दहा वर्षांपासून भाजप सत्तेवर आहे.
जनतेने तिसऱयांदा दिली भाजपकडे सत्ता
डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेतल्यापासून कोरोना सारख्या महामारीसह अनेक संकटांचा सामना करावा लागला. तरीही योग्य प्रशासन देऊन त्यांनी स्वतःची क्षमता सिद्ध केली. त्यामुळेच जनतेने तिसऱयांदा आम्हाला स्पष्ट बहुमत दिले. त्यांच्याच नेतृत्वाखाली 50 टक्के आमदार विजयी झाले. त्यासाठी आम्ही मतदारांचे आभारी आहोत, असे फळदेसाई म्हणाले.
कामत यांचा मानसिक गोंधळ?
एका बाजूने श्री. कामत भाजपच्या आमदारांनी लवकर सरकार स्थापन करावे, असे आवाहन करतात. दुसऱया बाजूने ते बिगर भाजप आमदारांनी एकत्र यावे, आम्ही सरकार स्थापनेचा दावा करुया, असे आवाहन करतात. तर तिसऱया बाजूने आम्ही सरकार स्थापनेचा दावा कदापी करणार नाही, असे पत्रकारांना सांगतात. यावरून एकतर त्यांचा मानसिक गोंधळ उडाला आहे किंवा त्यांनी संतुलन गमावले आहे, हेच स्पष्ट होते, अशी टीका फळदेसाई यांनी केली.
काँग्रेसचा स्वतःच्या आमदारांवर विश्वास नाही
कामत यांना सरकार स्थापन करायचेच असेल तर पत्रकार परिषदा घेऊन कुणाला आमंत्रण देतात? त्याचबरोबर गोवा फॉरवर्डच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त करताना मायकल लोबो हे, विजय सरदेसाई यांनी आता गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, असा सल्ला देतात. याला इशारा म्हणवे की आवाहन हेच समजत नाही, असेही फळदेसाई म्हणाले. यावरून काँग्रेसला आजही स्वतःच्या आमदारांवर विश्वास नाही का असा संशय निर्माण होतो. यातून काँग्रेसचे वैफल्य दिसून येते, अशी टीका फळदेसाई यांनी केली.
दरम्यान, येत्या लोकसभा निवडणुकीतही जनतेच्या पाठिंब्यावर आम्ही दोन्ही जागा जिंकणार आहोत, असा विश्वास फळदेसाई यांनी व्यक्त केला. आमदार श्री. गावडे यांनीही विचार मांडताना लवकरच सरकारचा शपथविधी होईल. केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे, असे सांगितले.