प्रदीप नारकर यांनी वेधले पालकमंत्र्यांचे लक्ष
प्रतिनिधी / ओरोस:
शेतकऱयांच्या सातबाऱयावर आंबा, काजू, नारळ, पोफळी व अन्य बागायती यांची नोंद नसल्याने तौक्ते चक्रीवादळाची नुकसानभरपाई मिळणे कठीण होणार आहे. दरम्यान, नुकसानीपासून एकही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी शासकीय यंत्रणेमार्फत केला जाणारा पंचनामा विशेष बाब म्हणून ग्राह्य धरुन नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप नारकर यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हय़ात तौक्ते चक्रीवादळ 16 मे रोजी दाखल झाले. याबाबत सागरी किनाऱयांसह अनेक गावातील शेतकरी, कष्टकरी यांच्या आंबा, काजू, नारळ, पोफळी व अन्य बागायती वादळामध्ये जमीनदोस्त झालेल्या आहेत. याची आपण स्वत: तसेच खासदार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहणी केलेली असून जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचे मान्य केलेले आहे. उपजिविकेचे साधनच या चक्रीवादळामुळे उध्वस्त झालेले आहे व त्याची झळ कित्येक वर्ष त्यांना सहन करावी लागणार आहे. त्यामुळे या नैसर्गिक आपत्तीमध्ये आपण कोकणातील शेतकऱयांना योग्य ते सहकार्य करून त्यांना परत एकदा स्वत:च्या पायावर खंबीरपणे उभे राहण्यासाठी आधार देणे आवश्यक आहे.
शासकीय यंत्रणेमार्फत कृषी सेवक, अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांच्यामार्फत प्रत्यक्ष पंचनामा करण्याचे काम आपल्या सूचनेप्रमाणे संपूर्ण जिल्हय़ामध्ये ज्या-ज्या ठिकाणी नुकसान झालेले आहे, त्याठिकाणी केले जात आहे. मात्र, नुकसान झालेल्या अनेक शेतकऱयांच्या सातबारावर आंबा, काजू, नारळ, पोफळी व अन्य बागायती यांची नोंद नसल्याच्या तांत्रिक अडचणींमुळे ते शेतकरी नुकसानीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणेमार्फत कृषीसेवक, अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांच्यामार्फत वस्तूस्थितीदर्शक प्रत्यक्ष केलेला पंचनामा ग्राह्य धरून त्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी योग्य ते सहकार्य करावे व शेतकऱयांना न्याय द्यावा, याकडे लक्ष वेधले आहे.