अध्याय तेरावा
ब्रह्मदेवांना त्यांच्या मुलांच्या म्हणजे सनकादिकांच्या प्रश्नाचे उत्तर देता येत नव्हते म्हणून त्यांनी भगवंतांचे स्मरण केले. त्यानुसार भगवंत हंस होऊन अवतीर्ण झाल्यावर त्यांना सनकादिकांनी असा प्रश्न विचारला की, तू कोण ? त्यावर भगवंत म्हणाले तुमचा हा प्रश्नच निरर्थक आहे कारण सर्वत्र एकच ईश्वरी तत्व भरून राहिले असल्याने इतर कुणालाही येथे जागा नाही. तसेच दिसणारी सर्व शरीरे पंचमहाभूतांपासून तयार झालेली असल्याने सर्वांचे मूलतत्व एकच आहे. मग हा मीतूपणा आला कुठून ? ही सर्व शरीरे दिसण्यापूर्ती वेगवेगळी आहेत एव्हढंच ! पण ज्या पंचमहाभूतापासून तयार झालेली आहेत ती पंचमहाभूतेही नाश होणारी असल्याने शरीरेही नाश होणारीच आहेत तेव्हा हे सर्व तात्पुरते असून सर्वत्र भरून राहिलेले आत्मतत्व हेच एकमेव चिरंतन आहे हे लक्षात घ्या. अंधारात पडलेली दोरी सापासमान भासते पण प्रत्यक्षात दोराच्या आंगामध्ये काही सर्प नसतो. तो त्याच्यावर भ्रमाने भासतो. त्या सर्पाला जर ‘तू कोण ?’ असे दोरच विचारील, तर त्याला काहीच अर्थ नाही.
उद्धवा ! अशा रीतीने त्यांच्या प्रश्नाचे खंडन मी त्या वेळी केले. त्या भाषणाने त्यांच्यांतील भेदभावाचे निरसन मी करून दाखविले. प्रश्नाचे खंडन करण्याच्या निमित्तानेच, ब्रह्मदेवाच्या आत्मज्ञानालाही उजाळा मिळेल या उद्देशाने मी बोलत होतो. माणसाला स्वतःच्या शरीराचा फार अभिमान असतो हे लक्षात घेऊन मी म्हणालो, कसली इंद्रिये ? आणि कसले प्राणी ? अहो, हे सर्व मुखवटे आहेत. जीव आणि शिव यामध्ये कधीही भेद नव्हता आणि नाही. ह्याहूनही गहन असे आत्मज्ञान. तेही मी त्यांना सांगितले. उद्धवा ! लक्ष देऊन ऐक. माझ्याशिवाय तिळाइतकीसुद्धा रिकामी जागा नाही. तेव्हा व्याप्य आणि व्यापक ह्या दोघांना सहजच अभिन्नत्व आहे. मनाला वाटते की अमुक अमुक गोष्टी वेगवेगळय़ा आहेत हे सर्व संकल्पामुळे घडते. परंतु माझ्या स्वरूपाचा जो भोवरा तेच मन असते. म्हणजे मी आणि मन वेगळे नव्हेत. त्यामुळे कितीही सावधपणाने मनाला पाहू लागले तरी ते मुळीच दृष्टीस पडत नाही. परब्रह्मही तसेच पूर्णपणे अदृश्य आहे. म्हणून दोन्ही सारखीच चैतन्यस्वरूप होत. शिंपला त्याच्यावर ऊन पडल्याने चमकतो आणि तो चांदीचा असावा असे वाटते पण ते खरे नसते. त्याचप्रमाणे माझ्या स्वरूपामध्ये मन ही केवळ कल्पना आहे ते मिथ्या असल्याने आहे असं वाटतं पण प्रत्यक्षात माझ्याहून वेगळं काहीच नसतं. म्हणून गीतेत सांगितल्याप्रमाणे मन ही माझीच विभूती आहे. आता शरीरातील इतर इंद्रिये ही सुद्धा माझ्या सांगण्याप्रमाणेच काम करतात. कशी ती सांगतो. वक्ता, वाच्य आणि वचन ही तिन्ही मीच होय. शब्द बोलणारा माझ्याशिवाय जगात दुसरा कोण आहे ? मी वेदांचा वेद आहे असे समज. मीच खरोखर ॐकारस्वरूप आहे. मुख्य वाणीची वाणी मीच आहे. शब्दाची जागा माझ्याशिवाय दुसरी नाहीच.
दृष्टीचे जे देखणेपण आहे ते मुख्य ज्ञान आहे. आत्मदृष्टीने चैतन्यस्वरूप असे पूर्णबह्मही तेच आहे. डोळा मीच, पाहणारा मीच, दृश्य मीच व खरोखर द्रष्टाही मीच. माझ्याशिवाय पाहण्याची शक्ति त्रिभुवनातसुद्धा मुळीच कुणाकडे नाही. डोळय़ांचा खरा डोळा मीच, माझ्याशिवाय पाहण्याच्या कलेला इतरांचा जिव्हाळा नाही. शब्दाला बोलणारा मीच, कर्णामध्ये ऐकणारा मीच, अशा ऐक्मयभावनेने पाहिले म्हणजे शब्दाची जी निःशब्दता तेच परब्रह्म होय. कान, भाषण आणि श्रोता मीच. शब्दाच्या अर्थाला जाणणारा मीच व ज्याला कान आहेत असा ऐकणाराही माझ्याशिवाय दुसरा कोणी नाही.
नाक मीच, वास मीच, सुवास जाणणारा मीच. सुवासाला राहण्याचे ठिकाण माझ्याशिवाय दुसरे नाही. जिव्हा ही रसज्ञपणाने मोठी उत्तम आहे पण ती केवळ चामडीच ! तिला बिचारीला कापून टाकली तर ती गोडी आणि अगोडी जाणत नाही. रस मीच, रसना मीच आणि रस सेवन करणाराही मीच.
इंद्रियांच्या ज्या इतर प्रवृत्ति आहेत, त्याही खरोखर मद्रूपच आहेत हे लक्षात घे.
क्रमशः