प्रतिनिधी / मिरज
भारतातील सुमारे ३५ टक्के धरणे महाराष्ट्रात असूनही, इतर राज्याच्या तुलनेत याच महाराष्ट्रात नव्वद टक्के भागात कायमस्वरूपी पाणी टंचाई आहे. पाण्याचे योग्य नियोजन याचा अभाव असल्याने हे घडत आहे, असे मत प्रा. डॉ. रवींद्र फडके यांनी व्यक्त केले. ते सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या वतीने बालगंधर्व नाट्य मंदिर येथे आयोजित केलेल्या केंद्र सरकारच्या जलशक्ति अभियान या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पाहुण्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. तसेच रोपांचे वितरण करण्यात आले. यावेळी यमुना चिकोडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रा. फडके पुढे म्हणाले की महाराष्ट्रामध्ये एक किलो साखर बनवायला दोन हजार लिटर पाणी लागते. तर उत्तर प्रदेशामध्ये एक किलो साखर बनवण्यासाठी १ हजार लिटर पाणी लागते. कमी पाण्यात येणारी पिके या संदर्भातील जनजागृती याकरता जलव्यवस्थापनाची आवश्यकता आहे. शंभर मिलिमीटर पाऊस पडला तर एक हेक्टर जमिनीवर दहा लाख लिटर पाणी साठवता येते. एका ढगफुटीत एवढा पाऊस पडू शकतो. हे पाणी साठवून ते मुरवणे आवश्यक असते, असे केले तरच भविष्यात महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न मिटेल, असेही प्रा. फडके म्हणाले.