भारताने चीनला सुनावले, जयशंकर यांची वांग यींशी चर्चा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी फोनवरून चर्चा केली असून लडाखमधील सर्व संघर्षबिंदूंवरून माघार घ्या अशी सूचना केली आहे. शुक्रवारी दुपारी ही चर्चा झाली. पँगाँग भागातून दोन्ही सेनांनी माघार घेतल्यानंतर आता अन्य क्षेत्रांसंबंधी चर्चा सुरू झाली आहे
गेल्या मे महिन्यापासून भारत आणि चीन यांच्यात लडाख सीमारेषेवर संघर्ष सुरू आहे. पँर्गांग सरोवर, गोग्रा, डेमलॉक, देपसांग इत्यादी स्थानांवर दोन्ही देशांच्या सेना एकमेकांसमोर उभ्या आहेत. कोणत्याही क्षणी तणाव वाढून युद्धसदृश संघर्ष सुरू होईल अशी स्थिती गेल्या महिन्यापर्यंत होती. तथापि, दोन्ही देशांच्या सैन्याधिकाऱयांनी चर्चेच्या नऊ फेऱया करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
याच पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी शुक्रवारी चर्चा केली. ही चर्चा साधारणतः 80 मिनीटे चालली, अशी माहिती सूत्रांनी दिली. पँगाँग प्रमाणे सर्वच संघर्षबिंदूंवरून माघार घेतल्यानंतरच दोन्ही देशांमधील संबंध पूर्ववत होऊ शकतील, अशी स्पष्टोक्ती भारताकडून आजवर अनेकदा करण्यात आली आहे. तिचाच पुनरूच्चार शुक्रवारच्या चर्चेतही करण्यात आला, अशी माहिती आहे.
तणाव निवळला
सध्या लडाख येथे चार स्थानांवर भारत आणि चीन यांच्या सेना एकमेकींपासून हाकेच्या अंतरावर उभ्या आहेत. चीनने आठ महिन्यांपूर्वी पुढे येऊन भारतीय सीमारेषेच्या आत घुसण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, भारतीय सेनेनेही निर्मनुष्य भूमीत पुढे सरसावून चीनच्या सेनेला भारताच्या भागात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले होते. यातूनच गलवान येथील संघर्ष 20 जून 2020 च्या मध्यरात्री घडला होता.