श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू काश्मीरमध्ये गेल्या 24 तासात चालू असलेल्या चकमकीत सुरक्षा जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. कुलगाममध्ये दोन तर श्रीनगरमध्ये एका दहशतवाद्याला ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. कुलगाममध्ये चालू असलेली चकमक सलग दुसऱया दिवशीही सुरू होती. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये हिजबुल कमांडर शिराज मौली आणि यावर भट्ट यांचा समावेश आहे. यापैकी शिराज मौली याचा तरुणांना फसवून दहशतवादी बनवण्याच्या कटात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच, निष्पाप लोकांच्या हत्येतही त्याचा हात होता. श्रीनगरमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव अमीर रियाझ असे असून तो पुलवामा येथील होता. तो ‘गजवातुल हिंद’ या दहशतवादी संघटनेशी संबंधित होता, असे काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी सांगितले.