व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर यांची माहितीः श्रीमंत विजयसिंहराजे यांच्याहस्ते होणार प्रतिष्ठापना
प्रतिनिधी/सांगली
सांगलीचे आराध्य दैवत श्री गजानन आणि श्री गणपती पंचायतन संस्थानच्यावतीने होणारा यावर्षीचाही गणेशोत्सव कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे अत्यंत साध्या पध्दतीने होणार असल्याची माहिती संस्थानचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर यांनी दिली. सलग दुसऱयावर्षी संस्थानचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने होणार आहे.
यावर्षी गणेशोत्सवास प्रारंभ शुक्रवारी 10 सप्टेंबर रोजी होणार आहे. यादिवशी सकाळी दहा वाजता श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन व राजपरिवारातील सदस्यांच्या उपस्थित राजवाडा येथील दरबार हॉल येथे प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या प्रसंगी कोणतीही मिरवणूक, वाजंत्री अथवा अन्य कोणताही लवाजमा असणार नाही. तसेच पूर्णपणे सामाजिक सुरक्षिततेचे पालन करून उत्सव साजरा केला जाणार आहे. तसेच मंगळवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता या गणपतीचे विसर्जनही राजपरिवाराच्या सदस्यांच्या उपस्थित अत्यंत साधेपणाने होणार आहे. यावेळी कोणताही मिरवणूक तसेच रथयात्रा पालखी असे काहीही असणार नाही. त्यामुळे भाविकांनी याठिकाणी कोणतीही गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोनामुळे हा उत्सव फक्त घरगुती
कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नाही. या उत्सवामुळे गर्दी होण्याची शक्यता आहे. या शक्यतेचा विचार करून हा उत्सव राजपरिवाराच्या उपस्थितीत फक्त घरगुती स्वरूपात केला जाणार आहे. कोणतेही कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत. त्यामुळे कोणीही गर्दी करू नये. तसेच दरबार हॉल, गणपती मंदिर व सरकारी घाट येथे विसर्जनप्रसंगी गर्दी करू नये असे आवाहन जयदीप अभ्यंकर यांनी केले आहे.