धाडवे परिवाराच्या देव्हाऱयात होणार कुलस्वामिनी विराजमान
प्रतिनिधी/ चिपळूण
सहय़ाद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या तिवरे गावात सव्वादोन वर्षांपूर्वी घडलेल्या धरण दुर्घटनेत वाहून गेलेले साहित्य आजही नदीपात्रात आढळत आहे. दोन दिवसांपूर्वी मासेमारी करणाऱया फणसवाडीतील व्यक्तीला नदीतील वाळूत रूतलेली एक फुटाची चांदीची मूर्ती मिळाली. ही मूर्ती धाडवे परिवाराच्या देव्हाऱयातील कुलस्वामिनीचा एक टाक असल्याने तो त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यामुळे सव्वादोन वर्षांनी धाडवे परिवाराच्या देव्हाऱयात ही कुलस्वामिनी विराजमान होणार आहे.
2 जुलै 2019 रोजी अमावस्येच्या रात्री तिवरेचे धरण फुटले. यात 22 जणांचा बळी व 45 कुटुंबाच्या संसाराची राखरांगोळी झाली. अलोरे येथे यातील 24 कुटुंबांचे पुनर्वसनही करण्यात आले आहे. वाहून गेलेल्या काही वस्तू, गृहोपयोगी साहित्य तसेच अलंकार आजही लोकांना मिळत असून ते लोक स्वतःहून या वस्तू बाधित कुटुंबापर्यत आणून देत आहेत. या दुर्घटनेत 54 वर्षीय रेश्मा रवींद्र चव्हाण आपल्या कुटुंबियाबरोबर घरासह वाहून गेल्या. त्यांचे मंगळसूत्र एका व्यक्तीला सापडल्यानंतर ते कुटुंबियाला आणून दिले. वाहून गेलेल्या ढोलकी, नाल आदी वाद्येही ज्यांना सापडली त्यांनी त्या-त्या कुटुंबाकडे आणून दिली.
दोन दिवसांपूर्वी तिवरे फणसवाडी येथील रमेश बांद्रे मासेमारी करण्यासाठी नदीत गेले होते. मासे पकडताना ते तोल जाऊन पडले. त्यावेळी त्यांना वाळूमध्ये काहीतरी चमकताना दिसले. तेथे खोदले असता चक्क फूटभर उंचीची चांदीची मूर्ती मिळाली. ही मूर्ती महादेव धाडवे यांच्या परिवाराच्या कुलस्वामिनीचा टाक असल्याचे समजल्यानंतर बांद्रे यांनी तो धाडवे यांच्याकडे सुपूर्द केला.