वार्ताहर/राजापूर
पाचलमधील पॉझिटिव्ह सहाही रूग्ण बरे होऊन त्यांना आरोग्य विभागाने घरी सोडल्याने तूर्त तरी पाचल गाव कोरोनामुक्त झाले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यामुळे ग्रामस्थांनी निश्वास टाकला आहे.
पाचल गावामध्ये 4 महिन्याने कोरोनाने शिरकाव केला होता. पाचलमधील एका मोहल्ल्यातील एकाच कुटुंबातील सातजणांना कोरोनाची लागण झाली होती. यातील एका 60 वर्षीय महिलेचा रत्नागिरी येथील कोविड सेंटर येथे मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या घरातील व तिच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली असता फक्त तिच्या घरातील सहाजणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यांना रायपाटण येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. योग्य उपचारानंतर सहाही जणांना शुक्रवारी कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.
कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर ग्रामपंचायत पाचलने गावामध्ये अनेक उपाययोजना करून गाव कोरोनामुक्त ठेवण्याचा प्रयत्न केला होता. पण अचानक ऑगस्टच्या पहिल्याच आठवडय़ात कोरोना रूग्ण सापडल्याने पाचलमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. व्यापारी संघटनेने लगेचच पाचल बाजारपेठ 8 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कोरोनाचे रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी आल्यामुळे पाचलवासीयांनी आनंद व्यक्त केला असून पाचल कोरोनामुक्त झाल्याचे बोलले जात आहे.