पूरग्रस्तांना मदत करण्यात राज्य शासन कमी पडणार नाही
प्रतिनिधी / सांगली
सांगलीसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी केंद्र शासनाने आपली जबाबदारी पार पाडावी. पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्यामध्ये राज्यशासन कुठेही कमी पडणार नाही. पूरग्रस्तांच्या मदतीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या दोन दिवसात घोषणा करतील अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी सांगलीत पत्रकार परिषदेत दिली.
सांगलीतील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी ते आले होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. सांगलीमध्ये निर्माण झालेल्या पूर परिस्थितीला धरणातील पाण्याचा फुगवटा कारणीभूत नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील, पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, आमदार अरुण लाड आदी उपस्थित होते.