मोबाईलप्रमाणे वीज मीटरही रिचार्ज मारावे लागणार : वीजचोरी आणि थकबाकी रोखण्यासाठी उपाय
जिल्ह्याचा आराखडा लवकरच
प्रतिनिधी / सांगली
वीज थकबाकी न भरणे आणि थकबाकी वसुलीसाठी आलेल्या वीज कर्मचाऱ्यांना दमदाटी करणाऱ्यांना विजेचे महत्व चांगलेच कळणार आहे. थकबाकी आणि वीजचोरी रोखण्यासाठी महावितरणने स्मार्ट प्रीपेड मीटर योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दर महिन्याला मोबाईल रिचार्जप्रमाणे वीज मीटरचेही रिचार्ज करावे लागणार आहे. जितके पैसे भराल तितकीच वीज वापरता येणार असून पैसे संपताच वीज पुरवठा खंडीत होणार आहे.
पहिल्या टप्प्यात घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना ही स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्यात येणार आहेत. त्यानंतर शेती ग्राहकांचा विचार करण्यात येणार आहे. राज्यात चाळीस लाख स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्यात येणार असून वीज अभियंते आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांना ही मीटर वापराबाबत प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यस्तरावर विकास आराखडा तयार करण्यात येत असून सर्व जुनी मीटर बदलण्यात येणार आहेत.
केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या आदेशानुसार 2025 पर्यंत संपूर्ण देशात प्रीपेड स्मार्ट मीटर योजना लागू करण्यात येणार आहे. ऊर्जा मंत्रालयाने तशी योजना तयार केली आहे. यामुळे चोरीचे प्रमाण कमी होऊन वीज कंपन्यावरील आर्थिक ताण कमी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
सध्या ग्राहकांना बिलाचा भरणा वापरलेल्या विजेच्या आधारावर करावा लागतो. त्यामुळे कोट्यावधी रूपयांची थकबाकी राहते. सध्या थकबाकीमुळेच महावितरणची आर्थिक घडी बिघडली आहे. आणखी दोन महिन्यांनी महावितरण कंपनी चालवायची कशी? असा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वसुलीसाठी कारवाईची जोरदार मोहीम सुरू केली आहे. तरीही वसुलीला फारसा प्रतिसाद मिळत नाही. पर्यायाने सरकारीसह खासगी कंपन्यांनाही आर्थिक आरिष्टाला सामोरे जावे लागत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी प्रीपेड स्मार्ट मीटर लावण्यात येणार आहे.
यामुळे वीजबिल भरण्याच्या पध्दतीमध्ये बदल होणार असून वीज वापरण्यापूर्वीच ग्राहकांना पैसे भरावे लागणार आहेत. मोबाईल रिचार्जप्रमाणे विजेसाठी रिचार्ज मारावा लागणार आहे. केंद्रीय उर्जा मंत्रालयाच्या सूचनांनुसार देशातील बहुतांशी राज्यांनी प्रीपेड मीटर बसवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे वीज कंपन्यांचा तोटा कमी होऊन या कंपन्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याचा सरकारचा विचार आहे.
प्रीपेड मीटर मोबाईलच्या सीम कार्डप्रमाणे दर महिन्याला रिचार्ज करावे लागणार आहे. आपल्याला कॉलिंग अथवा डाटा वापरासाठी आधी जसा रिचार्ज करावा लागतो. तसेच वीजबिल प्रीपेड मीटरला आधी रिचार्ज करावे लागणार आहे. वापरानुसार भरलेल्या पैशाची कपात होईल. जितके पैसे असतील तितकीच वीज वापर करता येईल. त्यानंतर कोणतीही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडीत होणार आहे. लवकरच या योजनेची सुरवात करण्यात येणार आहे.
घरगुती, व्यापारी आणि औद्योगिक ग्राहकांसाठी प्राधान्याने योजना ःपेठकर
स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याबाबत वरिष्ठ पातळीवर कार्यवाही सुरू आहे. जिल्ह्यात स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्यासंदर्भात लवकरच आदेश प्राप्त होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात घरगुती, औद्योगिक आणि व्यवसायिक ग्राहकांना ही मीटर प्राधान्याने बसवण्यात येणार असल्याची माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर यांनी दिली. शासनाचा हा महत्वकांक्षी प्रकल्प असल्याने लवकरच जिह्यात त्याची सुरवात होणार असल्याची माहितीही पेटकर यांनी दिली.