मराठा आरक्षणासाठी ठिय्या आंदोलन, अन्यायाविरिधात आंदोलक आक्रमक
प्रतिनिधी / कडेगाव
मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या झालेल्या सकल मराठा समाजातर्फे शुक्रवारी कडेगाव तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनस्थळ भगवामय झाले होते. यावेळी आक्रमक झालेल्या आंदोलकानी भगवे ध्वज उंचावत एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या व अन्यायाविरोधात आवाज उठविला.
शुक्रवारी सकाळी ११ वाजता मराठा आंदोलक तहसीलदार कार्यालायासमोर आंदोलन स्थळी दाखल
झाले. यावेळी आंदोलकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क घालून व सोशल डिस्टनसींग ठेऊन शिस्तीचा मानदंड कायम ठेवला. ‘अंदाज पावसापाण्याचा लावायचा असतो, मराठ्यांचा नाही,’ ‘अत्याचार करु देणार नाही आणि सहनही करुन घेणार नाही,’ ‘आता समाजाला न्याय मिळेपर्यंत आता माघार घेणार नाही,’ असा इशारा देत मराठा बांधवांनी अन्यायाविरोधात एल्गार पुकारला.
पोलिस आणि तालुका प्रशासनाने घेतलेली काळजी आणि मोर्चेकऱ्यांनी घडवलेले शिस्तीचे जबरदस्त दर्शन यांचा तंतोतंत मेळ बसला आणि गेले अनेक दिवस गाजत असलेले मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन शुक्रवारी शांततेत पार पडले. ठिय्या आंदोलन असले तरी प्रत्येकांच्या ओठाआड लपलेला हुंकार स्पष्टपणे जाणवत होता. यावेळी तरुण व जेष्ठ नागरिकांसह शालेय मुली व महिलांची उपस्थिती
लक्षणीय होती. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आंदोलकांनी अभिवादन केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, युवा नेते डॉ. जितेश कदम, मराठा क्रांती मोर्चाचे तालुका समनव्यक दादासाहेब यादव, इंद्रजित साळुंखे, नगराध्यक्षा नीता देसाई, भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष राजाराम गरुड, जगदीश महाडीक, साक्षी महाडीक व गायत्री शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सकल मराठा समाजातील शालेय मुलींच्या हस्ते मराठा आरक्षणासह विविध मागण्यांचे निवेदन कडेगावच्या तहसीलदार डॉ. शैलजा पाटील यांना दिले.
यावेळी दिग्विजय कदम ,हर्षवर्धन कदम,मराठा क्रांती मोर्चाचे तालुका समन्वयक राहुल पाटील , नेताजी यादव, सुनील मोहिते, कृष्णात मोकळे, अँड. प्रमोद पाटील, अभिजित महाडीक, ज्योती शिंदे, कोमल पवार, अविनाश माने, माजी सभापती मंदाताई करांडे, उपसभापती आशिष घार्गे, विजय शिंदे, सुभाष मोहिते, हिंदुराव यादव, इंद्रजित पाटील, सतीश मांडके, विजय मोहिते, सुरेश यादव, हणमंत पवार आदी उपास्थित होते.
कदम, देशमुखांचे सहकार्य :
हा मोर्चा कोणत्याही जातीविरोधात नसून मराठा समाजाच्या न्यायहक्कासाठी आहे. असे सांगत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख व युवा नेते डॉ. जितेश कदम यांनी आवर्जून उपस्थिती लावली. यावेळी दोन्ही नेत्यांनी मराठा क्रांती मोर्चाल सर्वोतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.