सांगली : साखर कारखानदारांशी सेटेलमेंट करणाऱ्या शेतकरी संघटनांचा सुळसुळाट
रघुनाथ दादांचा घणाघाती आरोप, सत्ताधाऱ्यांनी आमची शेतकरी संघटना फोडण्याचे पाप केले
प्रतिनिधी / मिरज
शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे भांडवल करुन केवळ राजकीय स्वार्थ साधण्यासाठी राज्यात तथाकथित बोगस शेतकरी संघटना सक्रिय झाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या मुळ प्रश्नांना हात न घालता कोणता तरी भरकटलेला विषय उचलून धरुन कारखानदारांशी सेलेंटमेट करण्याचा उद्योग सुरू आहे. स्व. शरद जोशी यांच्या विचारांतून काम करणाऱ्या आमच्या शेतकरी संघटनेची कृती सत्ताधाऱ्यांना पचनी पडत नाही. त्यामुळे या सत्ताधाऱ्यांनी पाशा पटेल आणि सदाभाऊ खोत यांच्या सारख्या कार्यकर्त्यांना आमिष दाखवून आमची संघटना फोडण्याचे पाप केले आहे, असा घणाघाती आरोप शेतकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी रविवारी पत्रकार बैठकीत केला.
भाजपाच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या आत्महत्येतत वाढ झाली आहे. केंद्रात आणि राज्यात कोणतेही सरकार आले तरी ते शेतकरी विरोधी आहे. महाराष्ट्राला शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा कलंक लागला आहे. हा कलंक पूसून टाकण्यासाठी महात्मा ज्योतीबा फुले आणि स्व. शरद जोशी यांच्या जयंतीचे औचित्य साधून 28 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर या कालावधीत जनप्रबोधन यात्रा काढण्यात येणार असल्याचे रघुनाथदादा पाटील म्हणाले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे भांडवल करुन राजकीय स्वार्थ साधण्यासाठी सध्या अनेक संघटना सक्रिय झाल्या आहेत. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत क्रांती, बळीराजा, शेतकरी संघर्ष समिती, अंकुश आंदोलन, जय शिवराय, भूमीपूत्र शेतकरी संघटना, सर्वहरा शेतकरी संघटना, शेतकरी सेना अशा अनेक संघटना साखर कारखानदारांशी सेटेलमेंट करीत असल्याचा आरोप रघुनाथदादा यांनी यावेळी केला. अशा बोगस संघटना उध्वस्त करुन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जनप्रबोधन यात्रेत सहभागी व्हा, असे आवाहन पाटील यांनी केले.