कृष्णानदीच्या पूरपट्ट्याची जल आयोग अधिकाऱ्यांकडून पाहणी
निरीक्षण केंद्रातील साधनसामुग्रीचा घेतला आढावा, पथकाला सतर्क राहण्याच्या सुचना
प्रतिनिधी / मिरज
ऑगस्ट २०१९मध्ये आलेल्या महाप्रलयंकारी महापूराची पुनरावृत्ती टाळण्यासाठी केंद्रीय जल आयोगाने आत्तापासूनच लगबग सुरू केली आहे. केंद्रीय जल आयोगाचे कार्यकारी अभियंता अभिषेक गौरव यांनी सांगली, सातारा, व कोल्हापूर जिल्ह्यातील निरीक्षण केंद्रांना भेट देऊन आढावा घेतला. सध्या पावसाची चाहूल लागली असून, जल आयोग पथकाने डोळ्यात तेल घालून संभाव्य महापूराचे निरीक्षण करावे. त्यासाठी आत्तापासूनच उपायययोजनांवर भर द्यावा, अशा सुचना अधिकाऱ्यांनी दिल्या.
१० केंद्रांवरुन महापूराचा अभ्यास
केंद्रीय जल आयोगाची देशभरात शेकडो उपकेंद्र आहेत. पुणे विभागात सांगली, कोल्हापूर, सातारा जिह्यांसाठी कराड, निपळी, वारंजी, तारगांव, नांद्रे, समडोळी, अर्जूनवाड, कुरुंदवाड, तेरवाड आणि सदलगा ही दहा उपकेंद्रे आहेत. आंध्र प्रदेशपासून महाबळेश्वरपर्यंत ही उपकेंद्र नदीपात्राचा अभ्यास करतात. महाबळेश्वर आणि अर्जुनवाड येथे स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आले आहे. अर्जूनवाड केंद्रावर पाणी तपासणीसाठी स्वतंत्र प्रयोगशाळा कार्यरत आहे. पाण्याची पातळी, गती, उंची, खोली आदीचे मोजमाप प्रामुख्याने करण्यात येते. या दहा केंद्रांवरुनच सांगली, कोल्हापूर आणि बेळगांव जिह्यातील संभाव्य महापूराची निरीक्षणे नोंदविली जातात.