देशातील 500 तर राज्यातील 75 हॉस्पिटल्सचा समावेश
संजय गायकवाड / सांगली
कोरोनाला हद्दपार करण्यासाठी आधुनिक वैद्यकीय क्षेत्र जीवतोड मेहनत घेत असतानाच हे संकट कमी करण्यासाठी आता आयुर्वेदिक डॉक्टर्स मैदानात उतरत आहेत. देशभरातील आयुर्वेदिक हॉस्पिटल्सचे कोव्हिड रुग्णालयात रूपांतर करण्यात येणार आहे. केंद्रीय आयुष मंत्रालयाने याबाबतचे आदेश काढले आहेत. यामुळे देशातील 500 आयुर्वेद मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल्स टप्प्याटप्प्याने कोविड रूग्णालये म्हणून सेवेत रूजू होतील. यात महाराष्ट्र व कर्नाटकातील 75 आयुर्वेद हॉस्पिटलचा समावेश आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना आरोग्य विभागावर कोरोनाचा प्रचंड ताण आहे. डॉक्टर्स आणि उपचारासाठीची यंत्रणा अपुरी पडू लागली आहे. बहुतांश राज्यात रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच केंद्र सरकार व केंद्रीय आरोग्य सचिव आदींनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचे काम सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून उपचारासाठी ज्या ज्या यंत्रणा व वैद्यकीय शाखा आहेत त्या सर्वांची मदत घेण्यात येत आहे. त्यामध्ये आयुर्वेद हॉस्पिटलचाही समावेश आहे.
आयुर्वेदशास्त्र ही भारतातील अतिप्राचीन उपचारपद्धती असून इतर शाखांच्या बरोबरीने या उपचारपद्धतीलाही मान्यता आहे. केंद्र सरकार स्तरावर या खात्याशी संबंधित स्वतंत्र आयुष मंत्रालय आहे. कोरोनाच्या लढाईत आता आयुर्वेदशास्त्र शाखेचीही मदत घेण्याचे केंद्र सरकारने ठरविले असून देशभरातील आयुर्वेद कॉलेज आणि हॉस्पिटलचे कोविड रूग्णालयात रूपांतर करण्याचा केंद्रीय आयुष मंत्रालयाने निर्णय घेतला आहे. याबाबतचे आदेश संबंधित आयुर्वेद हॉस्पिटलना देण्यात आले आहेत.
त्यानुसार देशातील 500 आयुर्वेदिक हॉस्पिटल लोकांना उपचारासाठी उपलब्ध होणार आहेत. महाराष्ट्रात आयुर्वेदिक हॉस्पिटलची संख्या 75 च्या आसपास आहे. तर कर्नाटकातही तेवढीच हॉस्पिटल्स आहेत. पश्चिम महाराष्ट्रात पुण्यात सर्वाधिक आयुर्वेदिक कॉलेज व हॉस्पिटल्स आहेत. सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर व कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातही अशी हॉस्पिटल उभी राहणार आहेत. यापैकी बेळगावसह काही जिल्ह्यातील आयुर्वेदिक हॉस्पिटलचे कोविड रूग्णालयात रूपांतर करण्याचे काम सुरू झाले आहे.
150 ते 250 बेडची हॉस्पिटल उभी राहणार
आयुष मंत्रालयाच्या या आदेशामुळे अशा आयुर्वेदिक कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये किमान 150 ते 250 बेडची कोव्हिड रूग्णालये उभारु शकतात. तेथे निधीबरोबरच आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी लागणार आहे. कोरोनावरील उपचारासाठी आयुर्वेदिक डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांची यंत्रणा सज्ज ठेवावी लागणार आहे. त्यांना याबाबतचे नेमके प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. त्यानंतर या लढाईत दोन हात करणाऱ्या इतर वैद्यक शाखा व यंत्रणेला आयुर्वेदाचे बळ मिळणार असून केंद्राचा हा निर्णय दूरगामी व चांगला परिणाम करणारा ठरू शकतो.
सध्या इतर औषधांबरोबरच आयुर्वेदिक औषधे व उपचारांचीही जोड दिली जात आहे. अनेक रूग्णांना आयुर्वेदिक औषधांचा चांगला परिणाम आला आहे. च्यवनप्राशसह आयुर्वेदिक औषधांचा खपही वाढला आहे. आयुर्वेदात 100 वर्षाची परंपरा असणाऱ्या अनेक नामांकित कंपन्या देशभरात कार्यरत आहेत. या कंपन्याची अनेक औषधे जगभरात निर्यातही केली जात असून या निर्णयामुळे त्यांच्या उत्पादनामध्ये होणार आहे.