प्रतिनिधी / सांगली
सांगली जिल्हय़ात शनिवारी नवीन 289 रूग्ण वाढले तर 191 जण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचार सुरू असताना 18 जणांचे मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये जिल्हय़ातील 16 जणांचा आणि परजिल्हय़ातील दोघांचा समावेश आहे. एकूण जिल्हय़ात 309 जणांचा आजअखेर कोरोनाने बळी गेला आहे.
महापालिका क्षेत्रात 163 रूग्ण वाढले
महापालिका क्षेत्रात शनिवारी कोरोनाच्या रूग्णात वाढच दिसून आली आहे. सातत्याने हे रूग्ण वाढत चालले आहेत. महापालिका क्षेत्रात नवीन 163 नवीन रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये सांगली शहरात 120 तर मिरज शहरात 43 रूग्ण वाढले आहेत. महापालिकेकडून वाढत्या रूग्णसंख्येला रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच महापालिकेने अदिसागर मंगल कार्यालय येथे नवीन रूग्णालय सुरू केले आहे. याठिकाणी 14 जणांच्यावर उपचारही सुरू करण्यात आले आहेत. पण तरीही सातत्याने रूग्णसंख्या वाढतच चालली आहे. त्यातच महापालिकेकडून रॅपीड ऍण्टीजन टेस्ट मोठय़ाप्रमाणात सुरू करण्यात आली आहे. या टेस्टमध्ये मोठय़ाप्रमाणात रूग्ण आढळून येत आहेत. सध्या जे रूग्ण वाढत आहेत. ते रूग्णांच्या संपर्कात आलेले हायरिस्क नातेवाईक आहेत. तसेच रूग्णांच्याबरोबर काम करणारे त्यांचे सहकारी आहेत. शहरातील गावठाणसह विविध उपनगरात हे रूग्ण आढळून आले आहेत. मिरजेत मात्र शनिवारी सांगलीच्या तुलनेने कमी रूग्ण वाढलेले आहेत. याठिकाणी 43 रूग्ण वाढले आहेत. सांगली मिरज महापालिका क्षेत्रात मात्र आजअखेर एकूण रूग्णसंख्या चार हजार 904 झाली आहे.
ग्रामीण भागात 126 रूग्ण वाढले
ग्रामीण भागातही मोठय़ासंख्येने रूग्ण वाढले आहेत. नवीन 126 रूग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये आटपाडी तालुक्यात पाच, जत तालुक्यात 23, कडेगाव तालुक्यात 10 रूग्ण वाढले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात आठ, खानापूर तालुक्यात 16, मिरज तालुक्यात 18 रूग्ण वाढले आहेत. पलूस तालुक्यात तीन, शिराळा तालुक्यात नऊ, तासगाव तालुक्यात 11 आणि वाळवा तालुक्यात 23 रूग्ण वाढले आहेत. असे एकूण ग्रामीण भागात 126 रूग्ण वाढले आहेत.
जिल्हय़ातील 16 जणांचा मृत्यू
जिल्हय़ातील 16 जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगली शहरातील चौघांचा मृत्यू झाला आहे. शहरातील 46 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर 82 वर्षीय व्यक्तीचा भारती हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. 60 वर्षीय व्यक्तीचा सिनर्जी हॉस्पिटल येथे तर 61 वर्षीय व्यक्तीचा कुल्लोळी हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. मिरजेतील तीन व्यक्तीचा मृत्यू झाला 75, 68 आणि 48 वर्षीय व्यक्तीचा मिरज कोरोना रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. इस्लामपूर येथील 48 वर्षीय व्यक्तीचा भारती हॉस्पिटल येथे तर 45 वर्षीय व्यक्तीचा प्रकाश हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. मिरज तालुक्यातील खंडेराजुरी येथील 50 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. जत तालुक्यातील डफळापूर येथील 52 वर्षीय व्यक्तीचा कोरोना हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. पलूस तालुक्यातील सूर्यगाव येथील 53 वर्षीय व्यक्तीचा कोरोना हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. तासगाव येथील 55 वर्षीय व्यवतीचा कोरोना हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. वाळवा येथील 62 वर्षीय महिलेचा प्रकाश हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. तासगाव तालुक्यातील वासुंबे येथील 70 वर्षीय व्यक्तीचा घाटगे हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. खानापूर तालुक्यातील चिखलहोळ येथील 50 वर्षीय व्यक्तीचा ओम श्री हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. या 16 व्यक्तीच्या मृत्यूमुळे जिल्हय़ातील एकूण बळीची संख्या 309 झाली आहे.
परजिल्हय़ातील दोघांचा मृत्यू
शनिवारी परजिल्हय़ातील दोघांचा मृत्यू झाला आहे त्यामध्ये कोल्हापूर जिल्हय़ातील नरसोबावाडी येथील 96 वर्षीय व्यक्तीचा भारती हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. शिरोळ येथील 54 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात मृत्यू झाला. परजिल्हय़ातील 85 जणांचे आजअखेर मृत्यू झाले आहेत.
शनिवारी 191 जण कोरोनामुक्त
शनिवारी जिल्हय़ात उपचार सुरू असणारे 191 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सलग अकराव्या दिवशी मोठय़ासंख्येने रूग्ण बरे झाल्याने रूग्ण बरे होण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जिल्हय़ात आजअखेर बरे झालेल्या रूग्णांची संख्या चार हजार 768 झाली आहे. त्यामुळे रूग्ण बरे होण्याची टक्केवारी वाढतच चालली आहे.
कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण 8305
बरे झालेले 4768
उपचारात 3228
मयत 309