25 लाखांचे नुकसान, सुमारे तीनशे एकर शेतीचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर
म्हैसाळ / वार्ताहर
ढवळी ता. मिरज येथील वसंतदादा उपसा जलसिंचन सहकारी संस्थेच्या जलसिंचन योजनेचा कृष्णा नदीकाठी असलेला इरिगेशन जॅकवेल बुधवारी कृष्णा नदीत कोसळला. जकवेलमध्ये असलेले टर्बाइन व मोटरीही पाण्यात वाहून गेल्याने सुमारे २० ते २५ लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या जॅकवेलवर अवलंबून असलेल्या ढवळीसह परिसरातील सुमारे 300 एकर शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
गेले चार-पाच दिवसापासून धरण पाणलोट क्षेत्रात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोयनासह अन्य धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. दरम्यान लगतचा भराव खचत जाऊन मंगळवारी जॅकवेल एका बाजूला कललेला होता. तो बुधवारी सकाळी अचानक कोसळला. जॅकवेल कृष्णा नदीच्या पाण्यात पडताच परिसरात मोठा आवाज झाला. या जॅकवेलमध्ये ५० एचपीच्या दोन विद्युत मोटारी, पंपसेट आणि टर्बाईन होते. ते नदीच्या प्रवाहात वाहून गेले.
बेसुमार वाळू आणि माती उपसा तसेच 2019 च्या महाप्रलयंकारी महापुरामुळे या जॅकवेलला धोका निर्माण झाला होता. मागील महिन्यात आलेल्या महापुरानंतर सदर जॅकवेलला अधिक धोका असल्याबाबत महसूल प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र वेळीच दक्षता घेऊन त्याची दुरुस्ती न केल्याने सदरचे जॅकवेल नदीपात्रात कोसळले असल्याचा आरोप योजनेच्या सभासदांनी केला. ढवळीसह परीसरातील १७७ सभासदानी एकत्र येऊन जिल्हा भूविकास बॅंकेच्या माध्यमातून कर्ज काढून सदरची वसंतदादा सहकारी उपसा जलसिंचन योजना सन २००० मध्ये उभारली होती.