अपघाताची शक्यता, नागरिकांचे आरोग्य धोक्यात
वार्ताहर / दिघंची
दिघंचीमधील महामार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. परंतु पाण्याचा वापर न केल्याने सध्या दिघंची-आटपाडी रस्त्यावर धुळीचे लोटच्या लोट पसरत आहेत. ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात रस्त्यावरची धूळ उडत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. तर धूळ उडल्यानंतर समोरचे वाहनदेखील दिसत नाही त्यामुळे अपघाताची शक्यता देखील नाकारता येत नाही.
दिघंची-हेरवाड व दिघंची-टोप या महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यामधील दिघंचीकडून आटपाडीकडे जाणाऱ्या रस्त्याचे कामदेखील सुरू आहे. परंतु, दिघंची बसस्थानकापासून सुमारे चारशे मीटरपर्यंत रस्त्यावर मुरूम, खडी टाकण्यात आली आहे. सदरचे काम राजपथ इन्फ्रा कंपनीकडे आहे. परंतु, वेळोवेळी त्यावर पाणी मारले जात नाही त्यामुळे गाड्यांची ये-जा करताना धुळीचे लोट उठत आहेत. याच रस्त्यावर दोन दवाखानेदेखील आहेत. त्यामधील रुग्णांनादेखील या धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच धुळीमुळे नागरिकांच्या व येथील व्यापाऱ्यांच्या आरोग्यावर याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या रस्त्यावर प्रचंड वाहनांची ये-जा सुरू असते. तसेच रस्त्याच्या कामामुळे अवजड वाहनांची देखील वाहतूक वाढली आहे. या वाहनांची ये-जा होताना एवढी धूळ उडत आहे की समोरचे वाहनही दिसत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. संबंधित ठेकेदाराच्या गलथान व कुचकामी नियोजनामुळे येथील व्यापाऱ्यांना देखील धुळीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. धुळीमुळे संपूर्ण दुकानात व समानांवर धुळीचे थर साचत आहेत. एकंदरीत संबंधित ठेकेदाराने पाण्याचा वापर न केल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून संबंधित अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन ठेकेदाराला पाण्याचा वापर करण्याचा सूचना देऊन त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.