प्रतिनिधी / मिरज
नळपाणी कनेक्शन बंद केल्याने एकाच कुटुंबातील मुलगा, सून आणि सासू यांना काठीने आणि दगडाने मारहाण करुन जखमी करण्यात आले. शहरातील अण्णाभाऊ साठेनगर येथे गुरूवारी रात्री ही घटना घडली. याबाबत शारदा अनिल धोंगडे (वय 30) यांनी मिरज शहर पोलिसांत फिर्याद दिली असून, पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये दिपक पांडूरंग धोंगडे (वय 45), रतन दिपक धोंगडे (वय 17), सुनिल पांडूरंग धोंगडे (वय 34), कविता दिपक धोंगडे (वय 40), दिव्या दिपक धोंगडे (वय 19) आणि धोंडूबाई पांडूरंग धोंगडे (वय 65, सर्व. रा. अण्णाभाऊ साठेनगर) यांचा समावेश आहे.
शारदा धोंगडे आणि मारहाण करणारे सहाजण एकमेकांचे शेजारी आहेत. त्यांच्या घरासमोर एक नळपाण्याची चावी आहे. गुरूवारी रात्री शारदा या घरात झोपल्या असताना दिपक याने नळाचे पाणी सुरू केले. त्यामुळे शारदा यांनी बाहेर येउन नळाला कुलूप लावले. त्यावेळी दिपक याने पाण्याची चावी आमची आहे. तू का बंद केलीस, असे म्हणून शिवीगाळ केली.
त्यानंतर रतन, सुनिल, कविता, दिव्या आणि धोंडूबाई यांना बोलावून घेऊन मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या शारदा यांची सासू कृष्णाबाई, त्यांचा मुलगा भास्कर यांनाही मारहाण करण्यात आली. तर सुनिल धोंगडे याने बाजूस पडलेली विट घेऊन मारहाण केली. या मारहाणीत शारदा यांच्यासह मुलगा आणि सासूही जखमी झाले आहेत. याबाबत त्यांनी मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.