प्रतिनिधी / बोरगाव
वाळवा तालुक्यातील बोरगाव – रेठरेहरणाक्ष बंधारा काल रात्रीपासून पाण्याखाली गेला आहे. बोरगाव मळीभाग, रेठरेहरणाक्षला जाणारी वाहतूक ठप्प झाली असून दळणवळणाचा मार्ग बंद झाला आहे. कृष्णा नदीकाठच्या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पाणी गेल्यामुळे सर्व क्षेत्र पाण्याखाली आलेले आहे.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसाने कोयना धरणातील पाणीपातळी झपाट्याने वाढत असून धरणातून काल ११००० क्युसेस पाणी सोडण्यात आले असून कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. आज सकाळी ११ वाजल्यापासून ३५७३२ क्युसेस पाणी सोडण्यात आल्यामुळे कृष्णा नदीच्या काठावर असणाऱ्या गावातील बहे, बोरगाव, फार्णेवाडी, बनेवाडी, मसुचीवाडी, साटपेवाडी या गावांमध्ये पाणी शिरण्याचा धोका निर्माण होईल.
अशीच परिस्थिती राहिली तर मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे. अजून धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे पाणीपातळीत वाढ होणार आहे तर सद्या सन २०१९ सारखी पूरस्थिती निर्माण होईल या भीतीने सर्व नागरिकांच्या मध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या तीन दिवसांपासून पडणाऱ्या सतत धार पावसामुळे कृष्णा नदीपात्राच्या क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील शेती पाण्याखाली गेली आहे. दरम्यान कोयनेतून आणखी विसर्ग होत आहे. त्यामुळे पाणी पातळीत मोठी वाढ होणार असून प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.