ग्रामीण भागात 206 रूग्ण वाढलेः जिल्ह्यात चार जणांचा मृत्यूः 357 जण कोरोनामुक्त ः
प्रतिनिधी / सांगली
सांगली जिल्हात कोरोना वाढीचा वेग आटोक्यात येवू लागला आहे. महापालिका क्षेत्रात सोमवारी फक्त नऊ रूग्ण वाढल्ह्यात आहेत. ही अत्यंत दिलासा देणारी गोष्ट आहे. तर ग्रामीण भागात 206 रूग्ण वाढले आहेत. जिल्ह्यात उपचार सुरू असताना चार जणांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर 43 हजार 73 रूग्ण कोरोनाबाधित झाले आहेत. त्यातील 38 हजार 902 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
महापालिका क्षेत्राला अत्यंत दिलासा
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात गेल्या सहा महिन्यातच प्रथमच दहा पेक्षा कमी रूग्ण आढळून आले आहेत. ही महापालिका क्षेत्राला दिलासा देणारी गोष्ट आहे. सोमवारी महापालिका क्षेत्रात फक्त नऊ रूग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये सांगली शहरात सहा आणि मिरज शहरात तीन रूग्ण वाढले आहेत. आज अखेर महापालिका क्षेत्रात 15 हजार 771 रूग्ण झाले आहेत. त्यातील 91 टक्के रूग्ण बरे झाले आहेत.
ग्रामीण भागात 206 रूग्ण वाढले
महापालिका क्षेत्रात कोरोना आटोक्यात येत आहे. पण अद्यापही ग्रामीण भागात मात्र तो म्हणावा तसा आटोक्यात येत नाही. ग्रामीण भागात सोमवारी 206 रूग्ण वाढले आहेत. यामध्ये आटपाडी तालुक्यात आठ रूग्ण वाढले आहेत. जत तालुक्यात 20 कडेगाव तालुक्यात 21 तर कवठेमहांकाळ तालुक्यात 18 नवीन रूग्ण आढळून आले आहेत. खानापूर तालुक्यात 27 मिरज तालुक्यात 18, पलूस तालुक्यात 20 रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. शिराळा तालुक्यात 23, तासगाव तालुक्यात 13 तर वाळवा तालुक्यात 38 रूग्ण आढळून आले आहेत. असे एकूण 206 रूग्ण ग्रामीण भागात वाढले आहेत.
जिल्ह्यात चार जणांचे मृत्यू
सोमवारी जिल्ह्यात उपचार सुरू असताना चार रूग्णांचा मृत्यू झाला आहे. पलूस, तासगाव, वाळवा आणि मिरज तालुक्यात प्रत्येकी एक रूग्णांचा मृत्यु झाला आहे. मृत्यूचा दरही आता कमी झाला आहे. गेल्या सहा महिन्यात प्रथमच पाचपेक्षा कमी मृत्यू एका दिवशी झाले आहेत. ही दिलासा देणारी गोष्ट आहे. आजअखेर जिल्ह्यात कोरोनाने एक हजार 580 रूग्णांचा बळी गेला आहे.
नवीन रूग्ण 215
उपचारात 2591
बरे झालेले 38902
एकूण 43073
बळी 1580