वाढीव वीजबिलाच्या निषेधार्थ कार्यालयांना ठोकले टाळे
प्रतिनिधी / सांगली
महाविकास आघाडी सरकारने वाढीव वीज बिले माफ करण्याऐवजी सक्तीने वसुलीसाठी नोटिसा बजावल्या. त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी भाजपच्या वतीने हल्लाबोल करण्यात आला. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत महावितरणच्या कार्यालयांना टाळे ठोकले. सांगली, मिरज, आटपाडीसह जिल्ह्यात विविध ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले.
विश्रामबाग येथील महावितरण कार्यालयाला आमदार सुधीर गाडगीळ यांच्या उपस्थितीत जोरदार आंदोलन करण्यात आले. शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, पश्चिम महाराष्ट्र संघटक सरचिटणीस मकरंद देशपांडे, शेखर इनामदार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनानंतर अधीक्षक अभियंता धर्मराज पेटकर यांना निवेदन देण्यात आले.
सक्तीच्या वसुलीला विरोध
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोरोना काळातील वाढीव वीज बिल माफ करण्याचे आश्वासन दिले होते. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी याबाबत घोषणाही केली होती. मात्र आता वाढीव वीज बिलांची माफी सोडाच उलट वीजबिलाच्या वसुलीसाठी 75 लाख ग्राहकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. सरकार सक्तीने वीजबिल करण्याच्या प्रयत्नात आहे. याला भाजपचा तीव्र विरोध आहे.
जनतेला अडचणीत टाकू नका
एकीकडे कोरोनाच्या संकटात जनतेचे आर्थिकदृष्ट्या प्रचंड हाल झाले. जनता अडचणीत असताना सक्तीने वीज बिल वसुली म्हणजे हा जिझिया कराचा प्रकार असल्याचा आरोप करण्यात आला. कोरोनामुळे वीजबील भरण्याची क्षमता सामान्य माणसाकडे राहिलेली नाही. शेतकरीही वीजबिल भरण्याच्या अवस्थेत नाही. ऊर्जामंत्र्यांनीच 100 युनिटपर्यंतचे वीज बिलं माफ करण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासनही प्रत्यक्षात आले नाही. आश्वासने पूर्ण करायची धमक नसेल तर निदान अशी सक्तीने वीज बिलं वसूली करून जनतेला अडचणीत टाकू नये असे आवाहन करण्यात आले.
यावेळी संघटन चिटणीस दीपक माने, माजी महापौर संगीता खोत, धीरज सूर्यवंशी, मुन्ना कुरणे, मोहन वाटवे, गटनेते विनायक सिंहासने, अजिंक्य पाटील, संजय कुलकर्णी, रणजीत पाटील सावर्डेकर, युवराज बावडेकर, संदीप आवटी, सुबराव मद्रासी, महिला बालकल्याण सभापती गीतांजली ढोपे पाटील, सोनाली सागरे, अप्सरा वायदंडे, कल्पना कोळेकर, दरीबा बंडगर, शीतल कर्वे, पृथ्वीराज पाटील, विश्वजित पाटील, किरण भोसले, श्रीकांत वाघमोडे, अमर पडळकर, बाळासाहेब पाटील, राहुल माने, अमित भोसले, अतुल माने, भूपाल सरगर, रघुनाथ सरगर, यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते.
शहर कार्यालयाला टाळे ठोकले
राज्य शासनाने वाढीव वीज बिले माफ करण्याचे खोटे आश्वासन देत आता थेट कनेक्शन तोडण्याच्या नोटीसा देऊन जनतेची फसवणूक केली आहे. महाविकास आघाडी सरकार खोटारडे आहे. नोटिसा मागे घाव्यात अन्यथा वीज वितरण कंपनीचे कामकाज रोखण्यात येईल असा इशारा भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा नगरसेविका ऍड. स्वाती शिंदे यांनी दिला. भाजप महिला मोर्चाच्या वतीने आज हिराबाग कॉर्नर येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला वीज कनेक्शन तोडण्याच्या नोटीसा मागे घेण्याच्या मागणीसाठी टाळे ठोकले. या ठिकाणी भाजपा महिला मोर्चाच्या महिलांनी जोरदार निदर्शने केली. महाविकास आघाडी सरकारच्या धिक्काराच्या घोषणा देण्यात आल्या.
नोटीसा मागे घ्या नाहीतर…
कोरोना लॉकडाऊनमुळे लोकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बंद पडल्याने लोकांकडे पैसे नाहीत आणि राज्यातील सरकार तिप्पट वीज बिल वसुली करुन सर्वसामान्य लोकांचे खिसे रिकामे करतेय. नोटिसा मागे घेऊन जनतेला दिलासा न दिल्यास कंपनी कार्यालयाचे कामकाज होऊ देणार नाही असा इशाराही देण्यात आला आहे.
आटपाडी, कडेगाव, मिरजसह जिल्ह्याच्या विविध भागात महावितरण कार्यालयांना टाळे ठोकण्यात आले. भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सक्तीने वसुलीसाठी नोटिसा पाठवल्याचा निषेध नोंदवला.