झारीबाग येथील घटना, तीन लाखांचे नुकसान, पावसाचे पाणी झिरपून कोसळली भिंत
प्रतिनिधी / मिरज
मिरज शहरातील झारीबाग येथे जनावराच्या गोठ्याची भिंत कोसळून 20 शेळ्या आणि एक म्हैस जागीच ठार झाले. मंगळवारी रात्री ही घटना घडली. पावसाचे पाणी झिरपून सदरची भिंत जीर्ण झाली होती. ती अचानक कोसळल्यामुळे मुक जनावरांना जीव गमावावा लागला. मृत्यूमुखी पडलेल्या या पशुधानामुळे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
झारीबाग येथे प्रकाश यल्लाप्पा पाटील हे भाड्याच्या खोलीत राहण्यास आहेत. ते मोलमजूरी करीत असून, त्यांची पत्नी ही पशुपालन व्यवसाय करते. त्यांनी घरात एकूण 45 शेळ्या पाळल्या होत्या. तर एक म्हैस होती. घराशेजारीच असलेल्या एका मातीच्या भिंतीमध्ये लाकडी खांब रोवून त्यांनी जनावरांचा गोठा बांधला होता. मंगळवारी सायंकाळी पाचनंतर सर्व जनावरे त्यांनी गोठ्यात बांधून ठेवली होती. मात्र, साडेसातच्या सुमारास अचानक भिंत कोसळली. सदरची भिंती मोठी असल्याने थेट जनावरांच्या अंगावरच भिंत पडली. यामध्ये 20 शेळ्या आणि एक म्हैस जागीच ठार झाले.
भिंत पडल्याचा मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक धावून आले. सदरची भिंत मातीची असल्याने प्रचंड धुरळा उठला होता. त्यामुळे मातीत अडकलेल्या जनावरांना बाहेर काढण्यास अडचणी येत होत्या. धुरळा बाजूला झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी खोरे आणि पाटी घेऊन मातीचा ढिगारा बाजूला काढला असता 20 शेळ्या प्रचंड जखमी होऊन मृत झाल्या होत्या. तर म्हैसही तडफडक होती. मात्र, काही वेळानंतर तिचाही मृत्यू झाला. पाटील यांच्या 45 शेळ्यांपैकी 20 शेळ्या मृत झाल्या. 25 शेळ्या या सुखरुप आहेत. दरम्यान, मातीची भिंत कोसळून मुक जनावरांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.