प्रतिनिधी / मिरज
जिल्ह्यात शुक्रवारी कोरोना लसी संपल्या असून, मिरज शहर आणि ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रे सकाळनंतर बंद करण्यात आली. लसीसाठी नागरिक येत होते. मात्र, लसीकरण केंद्राबाहेर लावलेले फलक बघून नागरिकांना लसीविना परतावे लागले. पुन्हा लस कधी येणार याबाबत माहिती दिली जात नाही. पहिली लस घेतलेल्या नागरिकांनी ४५ दिवसांनी दुसरी लस घेण्यासाठी यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
कोरोनाची लस टोचून घेण्यास नागरिकांचा प्रतिसाद वाढला आहे. आत्तापर्यत जिल्ह्यात दोन लाख, ७० हजार हुन अधिक लोकांना लस देण्यात आली आहे. महापालिका क्षेत्र आणि ग्रामीण भागासाठी स्वतंत्र लसीकरण केंद्रे उभारली आहेत. जिल्ह्याला आत्तापर्यंत सहा वेळा लस मागवावी लागली होती. गुरुवारी सायंकाळपर्यंत भुयतांशी केंद्रावर किरकोळ प्रमाणात लसी शिल्लक होत्या. मात्र, शुक्रवारी सकाळी काही तासातच सर्व लसी संपल्या. त्यामुळे केंद्र बंद करावे लागले. दरम्यान, लसीसाठी नागरिक येतच होते. लसीकरण केंद्राबाहेर फलक लावून लस संपली असल्याचे सांगण्यात आल्याने अनेक नागरिकांना लसीकरणाविना परतावे लागले.