उपनगर आणि ग्रामीण भागालाही पावसाने झोडपले
प्रतिनिधी / मिरज
मिरज शहर आणि तालुक्याच्या ग्रामीण भागाला बुधवारी पहाटेपासूनच संततधार पावसाने झोडपून काढले. वादळी वारा, वीजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार बॅटींग सुरू झाल्याने काही काळासाठी ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. मालगांव, म्हैसाळ, खंडेराजूरी, सलगरे, एरंडोली या गावांसह परिसरातील बहुतांशी गावातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर शहर आणि उपनगरात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. दुपारपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती.
गेल्या तीन दिवसांपासून आधून-मधून पाऊस पडतच आहे. मंगळवारी दुपारपासून पावसास सुरुवात झाली. रात्रीच्या दरम्यान, पावसाने थोडी विश्रांती घेतली. मात्र, पहाटे चारपासून अचानक धुवाँदार पावसाला सुरूवात झाली. दुपारी बारापर्यंत पावसाने संततधार धरली. लक्ष्मी मार्केट, किसान चौक, महात्मा गांधी चौक, छत्रपती शिवाजी रोड, रेल्वे स्टेशन चौक, एसटी स्टँड परिसर, शास्त्री चौक, दत्त चौक आणि गाडवे चौक या परिसराला तळ्याचे स्वरुप आले. बाजार पेठांमधील उलाढाल ठप्प झाली. काही विक्रेत्यांचा भाजीपाला पावसाच्या पाण्यात वाहून गेला. तसेच उपगर भागाचीही संततधार पावसाने अक्षरश दैना उडाली. कुपवाड रोडवरील साळुंखे पार्कमध्ये अमृत योजनेसाठी रस्ता खोदण्यात आला आहे. या खड्ड्यात पावसाने पाणी साचून साळुंखे पार्कला तलावाचे स्वरुप आले. घरासमोर गुडघाभर चिखल साचल्याने येथे वास्तव्यास असलेल्या नागरिकांना घराबाहेर पडता आले नाही. ऐन पावसाळ्यात महापालिकेने खुदाई करुन ठेवल्याने शिवाय अनेक वर्षे रस्ताच दुरूस्त न केल्याने नागरिकांनी महापालिकेच्या भोंगळ कारभाराबद्दल रोष व्यक्त केला. महापालिका क्षेत्रात रहात असल्याची लाज वाटत असल्याची संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केले.
दरम्यान, मिरज शहराबरोबर ग्रामीण भागालाही पावसाने झोडपून काढले. आधीच सलग तीन दिवस पडलेल्या पावसामुळे शेकडो हेक्टर शेती उध्वस्त झाली होती. मात्र, बुधवारी पहाटेपासून धुवाँदार बरसणाऱ्या पावसामुळे द्राक्षबागा, ऊस, मका, सोयाबिन, ज्वारी आणि पालेभाज्यांची शेती पूर्णत पाण्याखाली गेली. हातातोंडाशी आलेली पिके उध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. मालगांव, गुंडेवाडी, खंडेराजूरी, सलगरे, आरग, बेडग, बोलवाड, टाकळी, एरंडोली, म्हैसाळ, ढवळी, नरवाड, विजयनगर, वड्डी या गावांमधील शेकडो हेक्टरी होती या पावसामुळे पूर्णत उध्वस्त झाली आहे. शेतकऱ्यांना काही पिकांची पुनर्पेरणी करावी लागणार आहे. दरम्यान, दिवसभर पाऊस सुरूच असल्याने शहर, उपनगर आणि ग्रामीण भागाची दैना उडाल्याचे चित्र होते.
पाऊस आला धावून, रस्ता गेला वाहून
शहरातील दत्त चौक ते गाडवे चौक या रस्त्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. रस्ता कामाचा नारळ फुटल्यापासून अतिशय संथगतीने काम सुरू आहे. रस्ता दीड फुट खुदाई करुन केला जाणार असल्याने खुदाईसाठीच दहा दिवस गेले. त्यानंतर आठ दिवसांपूर्वी या रस्त्याचे खडीकरण करण्यात आले होते. हॉटमिक्स करण्याचे काम बाकी होते. मात्र, सतत कोसळणाऱ्या पावसामुळे तीन दिवसात या रस्त्याची अवस्था पूर्वपदावर आली. पावसाच्या पाण्याचा लोंढा याच रस्त्यावरुन जात असल्याने खडीकरण केलेला रस्ता हॉटमिक्स होण्याच्या आधीच वाहून गेला. किरकोळ स्वरुपात डांबर ओतून टाकलेली बारीक खडीही वाहून गेली आहे. 56 लाख रुपये खर्च करुन केला जाणारा रस्ता दोन दिवसांच्या पावसातच वाहून गेल्याने ठेकेदाराच्या निकृष्ठ कामाचा पावसामुळे पंचनामा झाला आहे.