धोका पातळी 51, एका दिवसात नऊ फुटांनी वाढ, आज स्मशानभूमीत पाणी शिरण्याची शक्यता
प्रतिनिधी /मिरज :
गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार आणि धारणातून सुरू झालेला पाण्याचा विसर्ग यामुळे कृष्णानदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. गुरूवारी दिवसभरात मिरज कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये नऊ फुटांपर्यंत वाढ होऊन 38 फुटांवर पाणी पातळी पोहचली. कृष्णाघाटाची धोका पातळी 51 असून, पाणी पातळीमध्ये अशीच वाढ होत राहिल्यास आज शुक्रवारी स्मशानभूमीत पाणी शिरण्याची शक्यता आहे.
जिह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. तसेच धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस पडत असल्याने धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ होताना दिसत आहे. मिरज कृष्णाघाटावरील कृष्णानदीची पाणी पातळी गुरूवारी दुपारपर्यंत 29 फुटांवर स्थिर होती. मात्र, दुपारनंतर रात्री आठवाजेपर्यंत त्यामध्ये नऊ फुटांनी वाढ होऊन पाणी पातळी 38 फुटांवर पोहचली.
मिरज कृष्णा नदीची धोका पातळी 51 आहे. 45 फुटांपर्यंत पाणी पातळी वाढल्यास नदीचे पाणी पात्राबाहेर येऊन स्मशानभूमीत शिरते. त्यामुळे रात्रभर अशीच वाढ होत राहिली तर शुक्रवारी दुपारपर्यंत स्मशानभूमीत पाणी शिरण्याची शक्यता केंद्रीय जल आयोगातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. पाणी पातळीत वाढ होत असल्याने पूरपट्टय़ात राहणारे नागरिक आणि महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे.