न्यायालयाची दिशाभूल केल्याचा शेतकऱयांचा आरोप
प्रतिनिधी / बेळगाव
अलारवाड जवळ सांडपाणी प्रकल्पासाठी जमीन घेऊन त्या ठिकाणी सपाटीकरण करण्यात आले होते. यासाठी तब्बल 2 कोटी 4 लाख खर्च करण्यात आले आहेत. असे असताना पुन्हा अचानकपणे हलगा येथील शेतकऱयांच्या जमिनीतील उभ्या पिकांमध्ये बुल्डोजर फिरवून महापालिकेने पुन्हा शेतकऱयांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकरी विरोध करतील म्हणून पोलीस बळाचा वापर करत सोमवारी ही जमीन कब्जात घेण्यासाठी धडपड सुरु केली. यामुळे शेतकऱयांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
सांडपाणी प्रकल्पासाठी हलगा येथील सुपीक जमीन महापालिका घेण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून सुरु केला. त्याला शेतकऱयांनी तीव्र विरोध केला आहे. ही सर्व जमीन तिबार पिकी असल्यामुळे शेतकरी भूमीहीन होणार आहेत. तेंव्हा पूर्वी अलारवाड येथे सर्व्हे करण्यात आलेली जमीन घ्यावी, अशी मागणी शेतकऱयांनी अनेकवेळा केली आहे. त्याबाबत उच्च न्यायालयात जनहित याचीकाही काही शेतकऱयांनी दाखल केल्या आहेत.
सध्या कोरोनामुळे शेतकरी मोठय़ा अडचणीत आहेत. असे असताना सोमवारी उभ्या पिकांमध्येच बुल्डोजर आणि जेसीबी फिरविण्यात आला. मागीलवेळीही अशाच प्रकारे शेतकऱयांच्या जमीनीमध्ये उभ्या पिकांचे नुकसान केले होते. त्यानंतर आता पुन्हा शेतकऱयांचे नुकसान केले आहे. एक प्रकारे शेतकऱयांवर हुकुमशाही करतच शेतकऱयांची ही जमीन हिसकावली आहे. सोमवारी अचानकपणे पोलीस फाटय़ासह महापालिकेचे अधिकारी तेथे आले. त्यांनी अचानक उभ्या पिकातच बांध फोडण्यास सुरुवात केली. त्यावेळी शेतकऱयांनी विरोध करताच पोलिसांनी त्यांच्यावर दमदाटी केली.
अलारवाड येथे सांडपाणी प्रकल्पासाठी जमीन घेतली असताना हलग्याजवळच असलेली सुपीक जमीन घेण्याचा अट्टाहास का? असा सवाल करण्यात आला. अलारवाड येथील प्रकल्पासाठी खर्च करण्यात आलेला लेखाजोखा न्यायालयात हजर करणे गरजेचे होते. याबाबत न्यायालयाने महापालिकेला कारणे दाखवा नोटीस देखील बजावली होती. त्यानंतर न्यायालयात खोटा लेखाजोखा हजर केल्याचा आरोप शेतकऱयांनी केला आहे.
शेतकऱयांनी विरोध केला असता मागील वेळी जे तुमचे नुकसान झाले आहे, त्या पिकांची नुकसान भरपाई देवू याचबरोबर जमीनीचा दर देखील वाढवून देवू, असे आश्वासन दिले. मंगळवारी होणाऱया बैठकीला शेतकऱयांनी उपस्थित रहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. मात्र शेतकऱयांनी त्याला तीव्र विरोध केला. आम्हाला कोणतीच रक्कम नको तर आम्हाला जमीनच हवी आहे, असा अट्टाहास अधिकाऱयांसमोर मांडला आहे.
सोमवारी अचानकपणे हलगा-बस्तवाड परिसरातील रस्ते बंद करण्यात आले. त्यानंतर महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱयांनी या जमिनीत जाऊन जेसीबीच्या व बुल्डोजरच्या सहाय्याने जमीन कब्जात घेण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे जनतेतून तीव्र संताप व्यक्त होवू लागला आहे.