अखेर बिहारच्या मुख्यमंत्रीपदासाठी सातव्यांदा नितीशकुमार यांचा राज्याभिषेक करण्याचे निश्चित झाले आहे. ‘मनात नसताना केवळ भाजपच्या आग्रहाखातर आपण मुख्यमंत्री बनत आहोत’ असे बिहार राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर नितीश बाबूंनी जाहीर केले. बिहारला लोकशाहीची जन्मभूमी असे म्हटले जाते. इथल्या वैशाली नगरीत इतिहासात पहिल्यांदा लोकशाहीचा पाळणा हलला, असे दाखले भारताच्या जडणघडणी संदर्भात बोलताना नेहमीच दिले जातात. त्यामुळे येथे होणारी राजकीय जोडतोड, तडजोड आणि मोडतोड याला नेहमीच राज्यशास्त्राच्या परिभाषेत एखादे नाव शोधून बारसे घातले जाते. देशात आपल्या हिणकस राजकारणाचा अद्वितीय वस्तुपाठ ठेवणारे नेते आपल्या प्रत्येक उपद्व्यापाला एक कथित वैचारिक मुलामा फासतात आणि आपण केलेले ’जादूमंतर’ जनतेच्या समोर ठेवतात. बिहारच्या राजकारणात गेली बावीस वर्षे गाजत असणारे आणि अधेमधे राष्ट्रीय नेते बनवण्याची पात्रता असणारे म्हणून चर्चेत येणारे नितीश कुमार यांना ‘सुशासन बाबू’ म्हणून ओळखले जाते, ते बिहारी नेत्यांच्या जंगली सत्ताकारणाला पर्याय देणारा नेता म्हणून. पण हा पर्याय यंदाच्या विधानसभेला यशस्वी होईल किंवा नाही याची देशात चर्चा होती. आतातर हारूनही ते बाजीगर ठरले आहेत. ज्यांची साथ सोडली ते विरोधात आणि आणि ज्यांच्यासोबत तीन वर्षे सत्ता चालवली तेही अप्रत्यक्षरीत्या विरोधात, अशी स्थिती असताना नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री होतात आणि इतरांना कपाळावर हात मारून घ्यावा लागतो असे फक्त बिहारमध्येच घडू शकते. नितीशकुमार यांनी ते पुनः पुन्हा घडवून दाखवले. त्यांच्या मनात नसताना भाजपने त्यांना मुख्यमंत्री बनवायचे ठरवले आहे असे ते जेव्हा म्हणाले तेव्हा त्या छद्मी बोलांनी कोण घायाळ झाले नसतील? मौन राहून नितीश यांनीच सर्वपक्षीय बिहारी आणि राष्ट्रीय नेत्यांचा काटा काढला आहे. राजकारणातील एकापेक्षा एक नग ज्या भूमीत जन्माला आले त्या भूमीत सात वेळा स्वतःला राज्याभिषेक करून दाखवणे हे जागतिक आश्चर्य मानण्याइतके आगळे आहे. या सर्व उलाढालीत प्रतिमा दिवसेंदिवस खालावत जात असताना अपरिहार्यपणे त्यांचीच निवड करायला लागणे ही भाजपसाठीही खरेतर मोठय़ा यशानंतरची नामुष्की. पण बिहारच्या सत्तास्थापनेत अपयश आले तर महाराष्ट्राप्रमाणेच बिहार हे मोठे राज्य हातचे जायचेच पण त्याचा परिणाम बंगालमध्ये इतिहास रचणा-यावर व्हायचा हे जाणून देशभर आक्रमक असलेल्या भाजपने काळजावर दगड ठेवत तडजोड मान्य केली. त्या तडजोडीत नितीशकुमार हे अपरिहार्य नेते बनले आहेत. अशा घटनांमुळेच देशाला बिहारी नेत्यांचा हेवा वाटतो. 1989 मध्ये व्ही. पी. अर्थात विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या नेतृत्वाखालील जनता दलाचे जॉर्ज फर्नांडिस, लालूप्रसाद यादव, रामविलास पासवान, शरद यादव आणि नितीशकुमार हे पाच नेते होते. मंडल आणि राम मंदिर प्रश्नावरून भाजपने उचल घेतली तेव्हा जनता दल फुटला आणि लालूंचा राजद, पासवान यांची लोजपा आणि जॉर्ज, शरद यादव आणि नितीशकुमार यांची समता पार्टी तयार झाली. अटलबिहारी वाजपेयी मंत्रिमंडळात समता पार्टीचे तिन्ही नेते मंत्री झाले. कृषिमंत्री आणि अपघात झाल्यानंतर राजीनामा देणारे रेल्वेमंत्री म्हणून नितीशकुमार यांनी लालबहादूर शास्त्री यांचा पाईक अशी हिंदी पट्टय़ात प्रतिमा बनवली. 2005 साली विधानसभेला लालूंचे पंधरा वर्षांचे जंगल राज हटवण्यासाठी नितीश एक आश्वासक चेहरा म्हणून पुढे आले. अल्पमतात असल्याने त्यांचे मुख्यमंत्रिपद औटघटकेचे ठरले. मात्र त्यामुळे वाजपेयींशी त्यांची तुलना झाली आणि फेरनिवडणुकीत ते मुख्यमंत्री झाले. वाजपेयी-अडवाणींच्या मवाळ भूमिकेमुळे त्यांना आपली ’सेक्मयुलर’ ही प्रतिमा जपत भाजपसोबत राहणे सोपे झाले. लालूंपेक्षा चांगला कारभार केल्याने 2010 च्या निवडणुकीत ते सहज विजयी झाले. एकटय़ाच्या बळावर सत्ता आणण्याची संख्या त्यांनी गाठली आणि भाजपलाही 91 जागा मिळवून दिल्या. 2012 मध्ये विकासाचे गुजरात मॉडेल आणि बिहार मॉडेल यांची स्पर्धा होती. काँग्रेसविरोधी लाटेची संधी साधत 2014 मध्ये भाजपने नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवले आणि आपल्या सेक्मयुलर प्रतिमेला जपण्याचे निमित्त करून नितीशकुमारांनी भाजपला सत्ते बाहेर काढले. काँग्रेसशी हात मिळवले. मोदी बहुमताच्या जवळ पोहोचल्याने आणि आठ महिन्यांनी बिहारची निवडणूक असल्याने नितीशनी राजीनामा देऊन दलित नेते जीतनराम मांझी यांना मुख्यमंत्री करण्याची खेळी केली. खुसपट काढून पुन्हा मुख्यमंत्री बनले! 2015 मध्ये काँग्रेस आणि लालूंशी महाआघाडी करून सत्तेवर आले. पण राजदला 10 जादा जागा मिळाल्या. तरीही मुख्यमंत्री तेच आणि तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री बनले. वीस महिने कसेतरी सरकार चालवून एक दिवस लालूपुत्राला धक्का दिला आणि भाजपशी संगनमत करून गेली तीन वर्षे सत्ता चालवली. या सर्वात घटत चाललेली लोकप्रियता, ’पलटूराम’ अशी होणारी हेटाळणी आणि आपली शेवटची म्हणून जाहीर केलेल्या निवडणुकीचा निकाल ताजाच आहे. नितीश हेच आमचे मुख्यमंत्री असतील असे नरेंद्र मोदी यांच्याकडून त्यांनी वदवून घेतले. आता सोमवारी सातव्यांदा ते शपथबद्ध होतील. बिहारचा विकास, नोकऱया या मुद्यांवर 22 वर्षे गाजवूनही नितीश उत्तर ठरले नाहीत. मात्र बिहारच्या सत्तेचे उत्तर मात्र तेच बनून राहिले आहेत!
Previous Articleलोणार आणि रामसर
Next Article ललित – सईची कलरफुल लव्हस्टोरी
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.