सातारा पालिका कर्मचारी आले रडकुंडीला, कर्मचारी संघटनेकडून विचारणा
प्रतिनिधी/ सातारा
सातारा पालिकेचे कर्मचारी शहराची सेवा करतात. त्यांना त्यांच्या हक्कासाठी भांडावे लागत आहे. गेल्या दोन वर्षाच्या कोरोना काळात जीवावर उदार होऊन काम केले. त्या पालिका कर्मचाऱयांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम अद्याप पालिकेच्या कर्मचाऱयांकडून मिळालेली नाही, असा आरोप पालिका कर्मचारी संघटनेच्यावतीने करण्यात आलेली आहे. दरम्यान, पालिका कर्मचाऱयांच्या खात्यावर सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम जमा करण्यास प्रारंभ केला आहे, अशी माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.
सातारा पालिकेमध्ये सुमारे सव्वा सहाशे कर्मचारी हे विविध विभागात कार्यरत आहेत. या कर्मचाऱयांकडून शहरातील नागरिकांना मुलभूत सुविधा देण्याचे काम केले जात आहे. गेल्या दोन वर्षात कोरोना काळात त्यांनी चांगले काम केले आहे. राज्य सरकारकडून पालिका कर्मचाऱयांना सातव्या वेतन आयोगातल्या फरकाची रक्कम देण्याचे आदेश दिले गेले आहेत. मात्र, अद्याप पालिकेकडून अद्याप तो दिलेला नाही. त्यामुळे कधी कर्मचाऱयांना फरक मिळणार आहे, अशी विचारणा पालिका कर्मचारी संघटनाकडून सातारा पालिकेकडे केली जात आहे. अद्याप दिला नसल्याने कर्मचारी संघटनेकडून सांगण्यात आले. तर पालिका प्रशासनाकडून कर्मचाऱयांच्या खात्यावर वर्ग करण्याचे कामकाज सुरु आहे.
नुसती टोलवाटोलवी सुरु
याबाबत सेवानिवृत्त कर्मचारी व पालिका कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी सुनील भोजने म्हणाले, सातव्या वेतन आयोगाच्या दुसऱया हप्त्याच्या फरकाची रक्कम देण्यात येईल असे नुसतेच गेल्या कित्येक दिवसांपासून सांगितले जाते. परंतु प्रत्यक्षात कधी आस्थापना विभागाचे काम अपूर्ण तर कधी पेन्शन विभागाचे काम तर कधी खजिना विभागाचे काम अपूर्ण अशी टोलवाटोलवी सुरु आहे. पालिका प्रशासनाचे काम अंत्यत सुमार पद्धतीचे सुरु आहे. साहेबांकडे तीन तीन चार्ज असल्याने प्रशासनावर त्यांचा अंकुश राहिलेला नाही. तसेच सध्या काम करत असलेले कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱयांची वेतनाबाबतच पर्सनल बँक ऍकौंटची माहिती कर्जदार बँकांना आस्थापना विभागाकडून प्रत्येकवेळी परस्पर त्या कर्मचाऱयांना न विचारता दिली जाते. त्यामुळे ते त्या वेतनाच्या बँकांना पत्र देऊन त्यांचे व जामीनदारांचे पगार अडवत आहेत. त्यामुळे कर्मचारी रडकुंडीला आलेले आहेत. त्यांच्या कुटुंबाची उपासमार होत आहे. नियमाची पायमल्ली करणाऱया कर्मचाऱयांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.