प्रतिनिधी / सातारा
दि. 17 ते 26 जुलै अखेर जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन जाहीर झाला आहे. शहरासह ग्रामीण भागातही; कोरोना विषाणूचा प्रभाव वाढत आहे. आरोग्य विभागाची जबाबदारी दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जनतेची साथ आता अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठल्ये यांनी पत्रकाद्वारे केले आहे. प्रादुर्भाव वाढत असला तरी नियम पाळल्यास चिंता करण्याचे कारण नाही. कोरोना मुक्तीची संख्याही लक्षणीय आहे. आपण अकराशे चा टप्पा गाठला आहे .सर्वच आरोग्य कर्मचारी, अधिकारी तसेच इतर विभागातील अधिकारी, कर्मचारी रात्रंदिवस काटेकोर नियोजन करून प्रतिबंधासाठी झटत आहेत. काटेकोरपणे नियम पाळले जाणे गरजेचे आहे.
विषाणूच्या प्रभावाची साखळी तुटण्यासाठी कठोरपणे प्रशासनाने घालून दिलेले नियम सांभाळले पाहिजेत .सातत्याने मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे, वारंवार हात धुणे या बाबींवर कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे. सर्व कर्मचाऱ्यांना गाव पातळीवर सहकार्य करावे ,असे नमूद करून पुढे म्हटले आहे की, ग्रामसुरक्षा समिती आणि शहरातील प्रभाग समिती यांना सर्व नागरिकांनी पूर्ण सहकार्य करावे.आयुष मंत्रालय यांनी दिलेल्या आरोग्यविषयक मार्गदर्शक सूचना पाळाव्यात आणि कुटुंबात अवलंबावे. त्याचा देखील प्रादुर्भावाच्या प्रतिबंधासाठी खूप फायदा आहे.वाढत्या रुग्णसंख्येमुळे सतत चिंता करण्यापेक्षा सर्व नियम काटेकोरपणे पाळून आपले सामाजिक कर्तव्य बजावणे गरजेचे आहे. विनाकारण गर्दी करू नये. कारणाशिवाय घरातून बाहेर पडू नये.
आरोग्य असो कि महसूल पोलिस कर्मचारी; सर्वांनाच सहकार्य करावे. जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली नियंत्रण कक्ष अविरतपणे गेले चार महिने नियोजनबद्ध उपाय योजना करीत आहे. समाजातील सर्वच घटकांनी या प्रयत्नांना मनापासून सहकार्य करावे; असे देखील पुढे नमूद करण्यात आले आहे.