प्रतिनिधी / सातारा
वाई तालुक्यातील गुळुंब येथील आज चवणेश्वराची यात्रा होती. यात्रेच्या आदल्या दिवशी एका युवकाने मुंबईत आत्महत्या केली. तर त्याच्याच मित्राने वेळे गावच्या हद्दीत आज आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली असून गावात शोककळा पसरली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की वाई तालुक्यातील गुळुंब गावातील सूरज ज्ञानेश्वर भोजणे हा युवक व्यवसाय व कामानिमित्त मुंबई येथे असतात. त्यांनी ही राहत्या प्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यांचा विवाह नुकताच ठरला होता. स्वतःचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय होता. सहा ट्रक होते. मात्र, आत्महत्या केल्याचे कारण समजू शकले नाही. आज गुळुंबमध्ये देवाची काठी निघणार होती. तत्पूर्वी भोजणे याच्या निधनाचे वृत्त गावात समजले अन् कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा अगोदरच साधी करण्यात येणार होती.
सूरज भोजणे याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तोच दुपारी गावातील निलेश बंडू भिलारे ( वय30 ) याने वेळे गावच्या शुक्रराज पवार यांच्या शेतात झाडाला वायरने गळफास लावून घेतल्याची घटना घडली.त्याच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मात्र, त्याने दारूच्या नशेत आत्महत्या केल्याची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात त्याचा भाऊ राहुल भिलारे यांनी केली आहे. भुईंज पोलिस ठाण्याचे पोलीस नाईक अतुल आवळे हे तपास करत आहेत. निलेश याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दोघे ही एकमेकांचे चांगले मित्र होते. त्यांच्या निधनाने गावावर शोककळा पसरली आहे.