सातारा / प्रतिनिधी
जिल्ह्यातील 1496 ग्रामपंचायतीमध्ये ज्यांनी स्वच्छतेचे विचार रुजवले. चळवळ राबवली. सातारा जिल्ह्याचा झेंडा दिल्ली दरबारी ज्यांच्या मेहनतीने फडकविला. त्याच कंत्राटी कर्मचाऱ्यांना 1 ऑगस्ट पासून कामावर येऊ नका, 31 जुलैपासून सेवा समाप्त करण्यात येत असल्याचे पत्र अचानक धडकताच कालच अनेक कंत्राटी कर्मचाऱ्यांना धक्का बसला आहे.
आता करायच काय ?,अशा तणावाखाली हे कर्मचारी असून जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागालाच टाळा लागण्याची शक्यता आहे. जलस्वराज विभागातील पाणी गुणवत्ता सल्लागार, ग्रामलेखा समन्वयकाना एक महिन्यांपूर्वीच घरचा रस्ता दाखवला गेला आहे.
कोरोना सगळ्यांच्या मुळांवर उठला आहे. गेल्या चार महिन्यापासून अनेक बदल होत आहेत. बाहेर काम मिळेना आहे ते काम सुटू नये यासाठी खाजगी व कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
सातारा जिल्हा परिषदेत अनेक कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. गेल्या एक महिन्यांपूर्वी पाणी पुरवठा जलस्वराज विभागातील 9 जणांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. ते जलस्वराज विभागातील पाणी गुणवत्ता सल्लागार, ग्रामलेखा समन्वयक या पदावर कार्यरत होते. आता कालच एक पत्र आले असून ते हाती पडताच मानसिकता गंभीर बनली गेली आहे. त्या पत्रात जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन आणि तालुक्यातील गट साधन केंद्रातल्या कंत्राटी सल्लागारांची सेवा दि. 31पासून समाप्त होईल असे म्हटले आहे. सातारा जिल्ह्यातील प्रत्येक गावात स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी पायाला भिंगरी लावून काम केले. राज्य पातळीवर, देश पातळीवर सातारा जिल्हा परिषदेच्या कामाचा डंका पिटला असे असताना दि. 27 रोजी आलेले पत्र पाहून बहुतांशी सर्वानाच धडकी भरली आहे. संकट काळात वाऱ्यावर सोडण्याचा प्रकार सरकारने केला असून अनेकांची वय झालेली आहेत. मानसिक तणावाखाली आल्याचे चित्र असून या विभागाला दि.1 रोजी टाळ लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.